बंगळुरू - कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मुलगा निखिल गौडा याचा लग्नसमारंभाचे स्थळ बदलले आहे. आता रामनगर जिल्ह्यातील बिडाडी येथील फार्महाऊसवर हा सोहळा पार पडणार आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे राज्यातील विवाह आणि इतर धार्मिक कार्ये रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे निखिलचे लग्न बंगळुरूहून बिडाडीजवळील केथगनाहल्ली येथील कुमारस्वामीच्या फार्महाऊसमध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचे माध्यम सचिव के.सी. सदानंदा यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.
"कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. या विवाहसोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे नातेवाईक उपस्थित असतील," असेही सदानंद म्हणाले.
२८ वर्षीय निखिलचे लग्न राज्यातील काँग्रेस नेते एम क्रिष्णाप्पा यांची नात रेवती हिच्याशी होणार आहे. विवाह १७ एप्रिलला म्हैसूरमध्ये होणार होता. २५ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली तेव्हा १४ एप्रिलला लॉकडाऊन संपेल, या आशेने कुटुंबीयांनी कृष्णाप्पाच्या घरी हे लग्न ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने आणि बंगळुरूला कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे हे लग्न फार्महाऊसमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सदानंद यांनी दिली. या लग्नसमारंभासाठी कुमारस्वामी यांनी राज्य सरकारची परवानगी घेतली आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणे आणि सॅनिटायझर वापरणे, या गोष्टींचे पालन करण्यात येईल, अशी हमीही त्यांनी दिली आहे.
या लग्नसमारंभात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मंत्री एच डी रेवन्ना, लोकसभा सदस्य प्रज्वल हेगडे आणि इतर नातेवाईक उपस्थित असतील.
"कुमारस्वामी यांनी पक्षाचे नेते, कार्यकर्ते व समर्थकांना आपापल्या घरातून या जोडप्याला आशीर्वाद द्यावा, अशी विनंती केली आहे. तसेच लॉकडाऊन असल्यामुळे कोणीही फार्महाऊसकडे जाऊ नका" असे आवाहन केले आहे. उन्हाळ्यानंतर स्थिती पूर्ववत झाल्यानंतर भव्य स्वागत समारंभ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.