रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. रविवारी काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये राज्यातली प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर सरकार आल्यानंतर 6 महिन्यांच्या आत राज्य सरकारच्या विविध विभागांतील आणि क्षेत्रीय कार्यालयांतील रिक्त पदे भरण्यात येतील, असे काँग्रेचे नेते आरपीएन सिंह यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यातून...
- पोलीस नोकऱ्यांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येईल.
- शेतकर्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.
- रांचीमध्ये मेट्रो सेवा सुरु करण्यात येईल.
- ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे 10 हजारांपेक्षा कमी असेल. त्या कुटुंबातील मुलांना सायकल देण्याता येईल.
- मॉब लिंचिगविरोधात कठोर कायदा करण्यात येईल.
- प्रत्येक ग्रांमपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा देण्यात येईल.
- प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ग्रंथालय उभारण्यात येईल. याचबरोबर एक ई-ग्रंथालय सुरु करण्यात येईल, अशा योजनांची काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यातून घोषणा केली आहे. या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांपासून स्त्रियांपर्यंत अशी सर्वांची काळजी घेतली आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ८१ विधानसभेच्या जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये राज्याच्या निवडणुका होणार आहेत. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० ला पूर्ण होत आहे. त्याआधीच नवे सरकार स्थापन करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांनी निवडणूकपूर्व युती जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेस ३१, राजद 7, तर जेएमएम सर्वाच जास्त ४३ जागा लढवेल. या युतीकडून मुख्यमंत्रीपदासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव पुढे केले जात आहे. झारखंडमध्ये सध्या मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आहे.
२०१४ साली झारखंड विधानसभा निवडणुका ५ टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी २ कोटी ५२ हजार ८०८ अधिकृत मतदार होते. त्यापैकी १ कोटी ३८ लाख ५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.