हैदराबाद : केंद्र सरकारद्वारे नागरिकांसाठी जनेरिक औषधांची सुविधा पुरवण्यात आली आहे. ही औषधे ब्रँडेड औषधांपेक्षाही कितीतरी पटीने स्वस्त असल्याने गरीब नागरिकांना ती सहज परवडण्यासारखी आहेत. मात्र तरीही जेनेरिक औषधांबाबत नागरिकांना अद्याप पुरशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जेनेरिक औषधांबाबतची जनजागृती करण्यासाठी मार्चच्या पहिल्या सप्ताहात जनऔषधी सप्ताह साजरा केला जातो. तर देशात जेनेरिक औषधांचा प्रसार वाढवून जागरूकता करण्यासाठी 7 मार्चला जनऔषधी दिन साजरा करण्यात येतो.
नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक :आजारामुळे सगळ्याच वर्गातील नागरिकांना त्रास होतो. परंतु आजार बरे करण्यासाठी औषधे घेणे कधीकधी दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी चिंतेचे कारण बनते. काही औषधे खूप महाग असल्याने नागरिकांना औषध घेणे शक्य होत नाही. त्यासाठी भारत सरकारने जेनेरिक औषधांचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे औषधांची किंमत कोणत्याही व्यक्तीच्या उपचारात अडथळा ठरू नये असा प्रयत्न सरकारचा आहे. आजारात प्रत्येक व्यक्तीला औषधे उपलब्ध व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी अनेक जनऔषधी केंद्रेही चालवली जात आहेत. मात्र तरीही नागरिकांना जेनेरिक औषधांबाबत फारशी माहिती नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे जेनेरिक औषधी :जेनेरिक औषधी ही प्रत्यक्षात ब्रँड नाव नसलेली औषधी आहे. या औषधांची किंमत तुलनेने खूपच कमी आहे. परंतु ती लोकप्रिय ब्रँडच्या महागड्या औषधांइतकी सुरक्षित, प्रभावी आणि फायदेशीर असल्याचा दावा करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना जेनेरिक औषधी फायदेशीर ठरत आहे.