यवतमाळ -मागील दोन दिवसात झालेल्या अतिपावसामुळे राळेगाव, पांढरकवडा, मारेगाव, नेर आणि आर्णी या तालुक्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या पाच तालुक्यातील 1330 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. कुठे शेतात पाणी साचले तर अनेक ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. सुरूवातीला बोगस बियाणे, दुबारपेरणी, सोयाबीनवरील खोडमाशी यात आता अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना आला आहेत.
शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना; दोन दिवसांच्या अतिवृष्टीने साडेतेराशे हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान
अति पावसाने अनेक छोटे ओढे नाले यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावकऱ्यांच्या घरात शिरले. आणि घरातील अन्नधान्य आणि शेतीसाहित्य वाहून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आणि शेती पिकांचे प्रचंड मोठं नुकसान झाले आहे. राळेगाव तालुक्यातील साधारण 7 गावात पुरामुळे जास्त नुकसान झाले आहे. तर 1126 हेक्टर वरील शेतातील कपाशी सोयाबीन तूर पीक वाहून गेले आहे.
बोरी, अस्टोना गावात नुकसान जास्त झाले असून एकुर्ली गावात आलेल्या पुरात शेतात पाणी गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. पांढरकवडा तालुक्यात 37 हेक्टर जमिनीचे, मारेगाव तालुक्यात 25 हेक्टर, नेर तालुक्यात 100 हेक्टर तर आर्णी तालुक्यात 43 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गावांत नागरिकांना सानुग्रह अनुदान प्रशासन देणार असून जी आवश्यक मदत आहे ती तात्काळ करण्याच्या सूचना कृषी आणि महसूल विभागाला दिल्या असे आमदार डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.