वाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने शासनाने नव्या कृषी धोरणाचा अवलंब केला आहे. यासाठी जिल्हाभरातील सौरपंपासाठी ८४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले असताना केवळ १५० अर्जांना महावितरणकडून मंजुरी देण्यात आली आहे. निकषात न बसल्याने तब्बल ६९९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आधीच पारंपरिक वीज जोडणीपासून वंचित असताना आता सौरपंपही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.
पारेषणविरहीत सौर कृषिपंप घेण्याचा पर्याय उपलब्ध -
पुढील तीन वर्षात ग्राहक आणि शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता, सर्व कृषी ग्राहकांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरुपी दिवसा ८ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार नवीन कृषी वीज धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या धोरणात विद्यमान कृषिपंप ग्राहकांना पारेषणविरहीत सौर कृषिपंप घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप शेतकऱ्यांना मिळणार आहे.