वर्धा- मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या कामांचा आढावा वर्धा जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. मान्सून सुरु होण्यापुर्वी नदी-नाल्यातील गाळ काढण्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, प्रत्येक तहसीलदाराने गाव स्तरावरील बचाव पथकाच्या याद्या अद्यावत करून घ्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावर्षी पावसाळयात डेंग्यू, मलेरियासोबतच कोरोनाशी लढावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेने स्वच्छता, आरोग्याच्या सोयींचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय समितीच्या मान्सुनपूर्व बैठका घेण्यात याव्यात. 1 जून पर्यंत आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्याचे मॉकड्रील घ्यावे. धरणाच्या गेटची देखभाल दुरुस्ती करुन घ्यावी. वीज पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या बघता ग्रामीण भागात योग्य ती जनजागृती करण्यात यावी. वीजेपासुन बचाव कसा करावा याबाबत लोकांना माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
अवकाळी पाऊस व चक्रीवादळ यामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन त्याचा अहवाल, तसेच संबंधित गावातील तलाठी यांनी तत्काळ अशा घटनेची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याची सोय करावी. इतर जिल्हयातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी गावातील नागरिकांमध्ये वावरु नये तसेच सदर शेतकऱ्यांच्या शेतावर काम करतांना मजुरांनी योग्य अंतर राखावे. गावातील शासकीय कर्मचाऱ्यांनी याबाबीवर लक्ष ठेवावे, असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले.
सर्व शासकीय कार्यालयात 100 टक्के कर्मचारी उपस्थितीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर जिल्हयात असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रुजू होण्याबाबत कळविण्यात यावे. तसेच त्यांना 14 दिवस विलगीकरणात ठेवल्यानंतर कामावर रुजू करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आज बैठकी दरम्यान दिल्यात.
जिल्हाधिकाऱ्यांनी आठ तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, सर्व नगरपरिषद मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार प्रिती डूडूलकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के उपस्थित होते.