ठाणे :जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन (Upsa Chanchan Yojana) योजनेच्या कामाला गती मिळाल्यास जळगाव आणि बुलढाणा जिल्हातील पाच तालुक्यात असलेल्या १०१ महसुली गावपाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला लाभ होणार आहे. विशेषतः बोदवड, मुक्ताईनगर, मलकापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतीरूपी पंढरी सिंचनाखाली यावी यासाठी बोदवड मधील भोले महाकाल मल्टीपर्पज फाऊंडेशनचे सदस्य व २२ शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याकरीता पायी दिंडी (Farmers Dindi from Jalgaon district) १ जानेवारी पासून थेट मंत्रालयात निघाली आहे. या पायी दिंडीतील शेतकरी आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दाखल झाले आहे. (Farmers Dindi )
४७४ किलोमीटरचा प्रवास : विशेष म्हणजे बोदवड तालुक्यातील तरुणांनी आपल्या शेतीला पाणी मिळावे व हे पाणी मिळण्याचे स्वप्न असलेली बोदवड परिसर उपसा सिंचन योजना पूर्ण करावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ते बोदवडहून पायी चालत मुंबई गाठणार आहेत. शेतकऱ्याची पायी दिंडी १ जानेवारी रोजीपासून जामनेर, पहूर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, विंचूर, निफाड, नाशिक, इगतपुरी, खर्डी, शहापूर, भिवंडी, ठाणे, बांद्रा ते थेट मुंबई मंत्रालय असा तेरा दिवसांत ४७४ किलोमीटरचा प्रवास ही पायी दिंडी करणार आहे.