महाराष्ट्र

maharashtra

केवळ रस्त्यात म्हशीचे दूध काढल्याचे कारण, भरदिवसा कुऱ्हाडीने हत्या

By

Published : Jun 13, 2021, 10:08 PM IST

म्हशीचे दूध रस्त्यावर काढल्याच्या रागातून 32 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील ममदाबाद येथे घडली आहे. विश्वनाथ बसन्ना पाटील (32 वर्षे, रा. ममदाबाद, अक्कलकोट) असे मृताचे नाव आहे. तर या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, 6 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

solapur
solapur

सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील ममदाबाद येथे ३२ वर्षीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले आहे. म्हशीचे दूध रस्त्यावर काढल्याच्या आणि धान्य दुसरीकडे ठेवण्याच्या कारणावरून हा खून झाला असल्याची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात झाली आहे. तीक्ष्ण हत्याऱ्याने डोक्यावर आणि पाठीत हल्ला करून भरदिवसा निघृण खून करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. विश्वनाथ बसन्ना पाटील (32 वर्षे, रा. ममदाबाद, अक्कलकोट) असे मृताचे नाव आहे. तर या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना शनिवारी (१२ जून) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवारी रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.

उपसरपंचासोबत वाद झाले होते

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र बिराजदार हे रेशन दुकानदार एका शाळेत धान्य ठेवून सार्वजनिकरित्या वाटप करत होते. मागील दोन दिवसांपूर्वी उपसरपंच कोळी यांनी हे धान्यवाटप ठिकाण तेथून हलविण्याबाबत सांगितले होते. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती.

या दोन कारणावरून झाला खून

स्वस्त धान्य दुकानाचे धान्य ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून व म्हशीचे दूध रस्त्यावर काढण्याच्या कारणावरून विश्वनाथ पाटील यांच्यावर संशयित आरोपी चिडून होता. अखेर शनिवारी सायंकाळी विश्वनाथ पाटील यांचा काटा काढण्याचे ठरले. चंद्रकांत मसण्णा गायकवाड, धोंडिबा मसण्णा गायकवाड, मसण्णा धोंडिबा गायकवाड, अंबादास शंकर कोळी, निंगप्पा शंकर कोळी, सूर्यकांत शंकर कोळी, बलभीम शंकर कोळी (सर्व रा. सर्व ममदाबाद) यांनी विश्वनाथ बसन्ना पाटील यांच्या डोक्यात कुऱ्हाड आणि तलवारीने घाव घातला. यात विश्ननाथ यांचा मृत्यू झाला.

विश्वनाथला सोडवताना 5 जण जखमी

विश्वनाथ पाटील यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला सुरू असताना सिद्धाराम हणमंत पाटील, रामचंद्र हणमंत बिराजदार, संजय बिराजदार व अजय बिराजदार आणि अन्य एक, असे 5 जण भांडण सोडवण्यासाठी गेले होते. पण संशयीत आरोपींनी सोडवण्यासाठी आलेल्यांवरही हल्ला चढवला. काठी, दगड व कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच घटनास्थळी उभा असलेल्या स्विफ्ट या चारचाकीचेही मोठे नुकसान केले. अशी तक्रार सिद्धाराम हणमंत पाटील यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे.

मारहाण करण्याऱ्यांचीही पोलिसात तक्रार

या घटनेची नोंद शनिवारी रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दुसरी बाजूही पोलिसांनी नोंद केली आहे. चंद्रकांत गायकवाड यांनी विश्वनाथ पाटील, संजय बिराजदार, सिध्दप्पा पाटील व अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध कुऱ्हाडी व तलवारीने मारुन जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत तक्रार दिली आहे. या घटनेतील सर्व जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमी असलेले संजय बिराजदार (२१ वर्षे) यांना सोलापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या 6 संशयित आरोपीस अटक

या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिली. यातील खुनाच्या आरोपातील 6 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एका संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

हेही वाचा -धक्कादायक! 'इंस्टाग्राम'वर व्हिडिओ पोस्ट करून तरुणीची आत्महत्या, लातूरमधील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details