महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात तेलगू भाषिकांचा गुढीपाडवा "उगादी पंडुगा' उत्साहात साजर

शहरातील पूर्व भागात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील प्रथेप्रमाणे उत्साहाने सन साजरे केले जातात. तेलंगणा आणि आंध्राप्रदेशात गुढीपाडवा सणाला "उगादी पंडुगा' नावाने आळखले जाते.

By

Published : Apr 6, 2019, 7:21 PM IST

संग्रहीत छायाचित्र

सोलापूर- शहरातील पूर्व भागात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील प्रथेप्रमाणे उत्साहाने सन साजरे केले जातात. तेलंगणा आणि आंध्राप्रदेशात गुढीपाडवा सणाला "उगादी पंडुगा' नावाने आळखले जाते. हा उदागी पंडुगा मोठ्या उत्साहाने सोलापूरात साजरा केला जातो.

अशी आहे "उगादी पंडुगा' सणाची परंपरा

गुढीपाडवा साजरा करताना सोलापुरातील तेलगू भाषिक

तेलगूजनांचा चैत्र शुद्ध प्रतिपदा उगादी पंडुगा (युगादी) म्हणजेच गुढीपाडवा. पुराणात सांगितल्याप्रमाणे, सोमकासूर राक्षस हा ब्रह्मदेवाकडून वेद चोरून समुद्रात लपतो. तेव्हा भगवान विष्णू मत्स्य अवतार धारण करून सोमकासुराचा शिरच्छेद करतात. ब्रह्मदेवाकडे वेद सुपूर्द केल्यानंतर ब्रह्मदेव आनंदाने सृष्टी निर्माण करतात. हा पवित्र असा सृष्टीचा उगमदिन (गुढी पाडवा) म्हणून तेलगू बांधव उगादी पंडुगा म्हणून साजरा करतात.

तेलामध्ये लक्ष्मीचा तर पाण्यात पार्वती देवीचा वास असतो, अशी श्रद्धा ठेवून या दिवशी पहाटेच अभ्यंगस्नान केले जाते. यानंतर घरांसमोर सडासंमार्जन, रांगोळी, दरवाजास आंब्याच्या पानांचे तोरण बांधून सजवतात. नवीन वस्त्रे परिधान करून भगव्या ध्वजाचे पूजन करतात. या दिवशी पहाटे वसंत ऋतूची चाहूल लागते. कोकीळ पक्ष्याच्या मधुर आवाजाने वातावरणात उत्साह संचारतो. या दिवशी झाडांना नवीन पालवी फुटल्याने निसर्ग बहरतो.

नवीन जावई, सून व नातवंडांना साखरेचे व खोबऱ्याचे हार घालण्याचा हा शुभदिवस असतो. हा कार्यक्रम सर्व नातेवाइकांना एकत्र आणतो. यानंतर वर्षभरात घडणाऱ्या शुभाशूभ घटना, देशरक्षण, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती आदी गोष्टींबद्दल सतर्क राहण्यासाठी तिथी, नक्षत्र, कर्णम, योग या घटनांमधून पंचांगाचे वेदमूर्ती, ज्येष्ठ नागरिकांकडून वाचन व श्रवण केले जाते. वसंत ऋतूतील उगादी पंडुगा कवी मंडळींसाठीदेखील पर्वणीच असते. या दिवशी सर्वत्र कवी संमेलनांचे आयोजन केले जाते.

"पच्चडी' व पिठाचे पदार्थ

तेलुगुजनांचे आवडते पेय पच्चडी हे षड्‍रुची असलेली कडुलिंबाची फुले, कैरी, तिखट, गूळ, मीठ, चिंच, हिंग फळांचा रस आदी पदार्थांपासून स्वादिष्ट असे पच्चेडी पेय बनविले जाते. आयुर्वेदात कडुलिंब व चिंचेपासून बनविलेल्या रसाचे मानवी आरोग्यासाठी महत्त्व सांगितले आहे. आंबट, तिखट, गोड, कडू, अशा सर्वच चवींचे सेवन या दिवशी झाल्याने सुख, दु:ख, आनंदाचे क्षण संपूर्ण वर्षभर सहन करू शकतो, असे मानले साखरेचे हार, कडुलिंब व आंब्याच्या पानांनी सजविण्यात आलेल्या माठात बनविलेल्या पच्चडीची व पंचांगाची पूजा केली जाते. मित्रमंडळी व नातेवाइकांना आमंत्रित करून पच्चडीचे सामूहिक सेवन केले जाते. तसेच पुरणपोळी व पिठाचे विविध पदार्थ बनवले जातात.

गुढीपाडवा अर्थात उगादी पंडुगा भावनाऋषी पेठेतील पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी सामुहिक पच्चडी सेवनाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details