सोलापूर- उजनी धरणातून भीमा नदीमध्ये दीड लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या 94 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनीतून दीड लाख क्यूसेकचा विसर्ग, नदीकाठच्या 94 गावांना सतर्कतेचा इशारा
उजनी धरणातून भीमा नदीमध्ये होणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या 94 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरण 76 टक्क्यांपर्यंत भरलेले असून पुणे जिल्ह्यातून पाण्याची आवक अजूनही सुरूच आहे. दौंड येथून अडीच लाख क्युसेक पाणी हे उजनी धरणात येत आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता उजनी धरणातून दीड लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
नीरा नदीच्या खोर्यात देखील पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वीर धरणातून 1 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी नीरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून सोडण्यात येणारे दीड लाख क्यूसेक आणि वीर धरणातून नीरा नदीत येणारे 1 लाख क्यूसेक असे एकूण अडीच लाख क्युसेक पाणी भीमा नदीमध्ये येत आहे.