सोलापूर- सोलापुरातील बोटांवर मोजण्याइतपत शाळांनी अग्निशामक दल विभागाची परवानगी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहर आणि जिल्ह्यातील शाळांच्या संस्था चालकांनी अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेतलीच नाही. पण, शिक्षणाधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शाळांमध्ये आगीच्या घटना घडल्या तर मोठा अनर्थ घडणार हे मात्र नक्की आहे. पण, अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार की काय, अशी विदारक परिस्थिती सोलापुरात पाहावयास मिळत आहे. सोलापुरातील बहुतांश शाळांनी अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेतली नाही. विद्यार्थ्यांसाठी ज्या शाळांमध्ये मध्यान्न भोजन व्यवस्था आहे, त्या शाळांना तर अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेणे गरजेचे आहे. पण याचे गांभीर्य कोणालाही नाही.
सोलापूर शहरातील मोजक्याच शाळांच्या संस्था चालकांनी अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेतली
सोलापूर शहरातील इंडियन मॉडेल स्कूल, पोतदार इंग्लिश मीडियम स्कूल, दयानंद लॉ कॉलेज, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, लिटल फ्लॉवर, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल या शाळांकडे अग्निशमन यंत्रणेची परवानगी आहे. पण, शेकडो शाळांनी अग्निशमन दलाकडून अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेतलेलीच नाही. शासनाच्या ज्या शाळांमध्ये मध्यान्न भोजनाची व्यवस्था असते. त्या ठिकाणी घरगुती वापराचे गॅस इंधन असते. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था असणे गरजेचे आहे. सोलापुरातील बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे पहायला मिळते. याकडे प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
15 मीटरपेक्षा अधिक उंचीची इमारत असल्यास अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे
सोलापूर शहरात शाळा व महाविद्यालयाच्या टोलेजंग इमारती पहावयास मिळतात. या इमारतींना पाहून विद्यार्थी आणि पालक आकर्षित होतात. 15 मीटर पेक्षा किंवा 50 फुटांपेक्षा शाळेची किंवा महाविद्यालयाची इमारत असल्यास त्यांच्याकडे प्रत्येत मजल्यावर अग्निशमन यंत्रणा असणे असणे गरजेचे आहे. पण, अनेक शाळा व महाविद्यालयांनी या महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील एका उर्दू शाळेच्या टोलेजंग इमारतीच्या बाजूला मोठी आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच येऊन ही आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. काही शिक्षक आणि विद्यार्थी त्या इमारतीत उपस्थित होते.