सिंधुदुर्ग - नारायण राणे यांच्या पूर्वइतिहासाचा पाढा आता राणे ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना भर विधानसभेत वाचला आहे. त्यामुळे राणे काय आहेत हे उभ्या महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी तर सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून यापूर्वीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राणे यांनी आता स्वतःच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज आहे. कारण त्यांची बेताल सुटलेली जीभ त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे, असा सल्ला कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिला आहे.
नारायण राणे यांची आज जी काही ओळख आहे, ती फक्त आणि फक्त ठाकरे कुटुंबामुळे आहे, हे सर्व राणेंनी लक्षात ठेवले पाहिजे. बाळासाहेब नसते तर नारायण राणेंची काय अवस्था असती, याचीही तिन्ही राणेंनी कल्पना करावी. काल (दि. 26 ऑक्टोबर) नारायण राणे ज्या शब्दात बोलले त्याला शुद्ध कृतघ्नपणा म्हणतात. ज्या ठाकरे कुटुंबाने राणे यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळख दिली. पदे आणि सन्मान दिला त्याच ठाकरे कुटुंबाच्या सदस्यावर राणेंनी पुराव्यांशिवाय केलेली चिखलफेक निषेधार्ह आहे. नारायण राणे आज केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाचे खासदार आहेत. त्यांचे म्हणणे ते आपल्या नेत्यांकडे मांडू शकतात. आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतात. पण, कसलाही पुरावा नसताना, एखाद्या चांगल्या व्यक्तीचे असे चारित्र्यहनन करणे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला शोभत नाही. उद्धव ठाकरेंच्या पुत्रावर टीका करताना आणि मुले काय करत आहेत, याचा अभ्यासही नारायण राणे यांनी करावा, असेही पारकर म्हणाले.
- जिथे खायचे तिथेच घाण करायची हा राणेंचा स्वभाव आहे