महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्गात रापणीला मोठ्या प्रमाणात जेलिफिश, मासे कमी आणि जेलिफिशच जास्त

By

Published : Jan 26, 2021, 12:41 PM IST

दांडी समुद्र किनारी एका रापणीला हजारोंच्या संख्येने जेलिफिश सापडले. त्यामुळे मच्छीमार अक्षरश: हैराण झाले. शंभरेक जेलिफिश बाजूला सारल्यावर त्यातून एक मासा मिळत होता, अशी बिकट परिस्थिती होती. जेलिफिशचा डंख लागल्यामुळे होणाऱ्या वेदनासुद्धा त्यांना सहन कराव्या लागत होत्या.

सिंधुदुर्गात रापणीला मोठ्या प्रमाणात जेलिफिश
सिंधुदुर्गात रापणीला मोठ्या प्रमाणात जेलिफिश

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातल्या मालवण दांडी येथील एका रापण संघाला जाळ्यात मोठ्या जेलिफिश मिळाले आहे. त्यामुळे मच्छीमारांवर वाईट वेळ आली आहे. जेलिफिशच्या या झुंडीत एका महाकाय जेलिफिशचे दर्शनही मच्छीमारांना झाले. गेल्या चार-पाच वर्षांत महाकाय जेलिफिश जाळ्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. सागरी अभ्यासकांच्या मते समुद्रात माणसाच्या आकाराएवढे जेलिफिश असतात.

जेलिफिशचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले
मासेमारी व्यवसायासमोर जेलिफिशचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मासे कमी आणि जेलिफिश जास्त अशी स्थिती आहे. दांडी समुद्र किनारी एका रापणीला हजारोंच्या संख्येने जेलिफिश सापडले. त्यामुळे मच्छीमार अक्षरश: हैराण झाले. मोठय़ा प्रमाणातील जेलिफिशमध्ये दबले गेलेले मासे वेगळे करताना मच्छीमारांची पुरती दमछाक झाली. शंभरेक जेलिफिश बाजूला सारल्यावर त्यातून एक मासा मिळत होता, अशी बिकट परिस्थिती होती. जेलिफिशचा डंख लागल्यामुळे होणाऱ्या वेदनासुद्धा त्यांना सहन कराव्या लागत होत्या. तरीही मच्छीमारांनी मासे वेचून झाल्यावर जेलिफिश किनाऱ्यावर न टाकता त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावत समुद्रकिनारा स्वच्छ केला. जेलिफिशला स्थानिक मच्छीमार ‘झार’ असे संबोधतात.

मासे कमी आणि जेलिफिशच जास्त
पुन्हा एकदा महाकाय जेलिफिशदोन वर्षांनी पुन्हा एकदा मालवणात महाकाय जेलिफिशचे दर्शन मच्छीमारांना झाले. थंडीत जेलिफिशना किनाऱ्यालगत पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे जेलिफिश मोठय़ा प्रमाणात किनाऱ्यावर स्थलंतरीत होतात आणि रापणीच्या जाळ्य़ात सापडतात. सागरी अभ्यासक जेलिफिशची वाढती संख्या मत्स्य दुष्काळाचे द्योतक मानतात. सागरी जैव साखळी कुठे तरी बिघडल्यानेच जेलिफिशची संख्या वाढली असल्याचे सागरी अभ्यासकांचे मत आहे. जेलिफिशला खाणारे समुद्री कासवांसारखे सागरी जीव कमी झाल्यामुळे जेलिफिश वाढले असावेत, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.


पर्यटकांना मारला डंख
जेलिफिशचा किनाऱ्यालगतचा संचार मच्छीमारांना त्रासदायक बनला. त्यामुळे समुद्र स्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांनाही खूप सावधगिरी बाळगावी लागतेय. तरीही काही पर्यटकांना जेलिफिशनी डंख मारल्याच्या घटना घडल्या आहेत. यात पर्यटकांचा हात अक्षरश: लाल झाला होता. अखेर वेदनांचा दाह कमी करण्यासाठी व्हेनेगर आणि गरम पाण्याचा मारा करून वेदनांवर मात करण्यात आली.

हेही वाचा -हे खरेच प्रजासत्ताक आहे का? सामनामधून केंद्रावर टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details