महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 27, 2019, 4:40 AM IST

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात पाटणच्या सुपुत्रांचा बोलबाला!

दुसर्‍यांदा आमदार झालेले पृथ्वीराज चव्हाण; दोनवेळा खासदार, पुन्हा सिक्कीमचे राज्यपाल आणि आता तिसर्‍यांदा खासदार झालेले श्रीनिवास पाटील या पाटण तालुक्यातील दोन सुपुत्रांचा सध्या जिल्हाभर बोलबाला आहे. पक्ष वेगळे असले, तरी एकाच तालुक्यातील असलेल्या या नेत्यांच्या कारकिर्दीची अनेक कारणाने सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Peoples governor Shriniwas Patil and former CM Pruthviraj Chavan

सातारा- पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ते दुसर्‍यांदा आमदार झालेले पृथ्वीराज चव्हाण आणि दोनवेळा खासदार, सिक्कीमचे राज्यपाल ते पुन्हा तिसर्‍यांदा खासदार झालेले श्रीनिवास पाटील या पाटण तालुक्यातील सुपूत्रांचाच सध्या जिल्हाभर बोलबाला आहे. पक्ष वेगळे असले, तरी एकाच तालुक्यातील असलेल्या या नेत्यांच्या कारकिर्दीची अनेक कारणाने सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आ. चव्हाण हे 2014 पासून सतत मोदींच्या धोरणांवर हल्लाबोल करत आहेत. म्हणून, कराड दक्षिणच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने मोठी फिल्डींग लावली होती. त्याचाच एक भाग म्हणून मोदींनी सातार्‍यात आणि अमित शहांनी कराडमध्ये सभा घेतली. इतके करूनही विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनीच बाजी मारली. तर, दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग तीनवेळा निवडून आलेल्या छ. उदयनराजे भोसले यांना पोटनिवडणुकीत चितपट केले. उदयनराजेंना पराभूत केल्यामुळे श्रीनिवास पाटील यांच्या लोकप्रियतेची राज्यभर चर्चा होते आहे.

पाटण तालुक्यातील कुंभारगाव हे पृथ्वीराज चव्हाण यांचे, तर मारूल हवेली हे श्रीनिवास पाटील यांचे मूळ गाव. पाटण तालुक्याने स्व. आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई, असे दिग्गज नेते राज्याला आणि देशालाही दिले. काँग्रेस दुभंगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यामुळे 1999च्या लोकसभा निवडणुकीत पाटण तालुक्याचे हे सुपुत्र एकमेकांविरोधात उभे होते. त्या निवडणुकीत कराड लोकसभा मतदार संघातील जनतेने पवारांचे जिवलग मित्र म्हणून राजकारणात नवख्या असणार्‍या श्रीनिवास पाटील यांना निवडून दिले आणि पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले. चव्हाण यांचा पराभव झाला होता, तरी काँग्रेसने 2004 मध्ये त्यांना पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री केले. केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर कराडमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीत खा. श्रीनिवास पाटीलही सहभागी होते.

पुढे श्रीनिवास पाटील 2004 ला दुसर्‍यांदा पुन्हा खासदार झाले. 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभरातच अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे 2010 मध्ये पृथ्वीराज यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. 2009 मध्ये श्रीनिवास पाटील यांच्या खासदारकीची मुदत संपली. त्याचवेळी लोकसभा मतदार संघाचीही पुर्नरचना झाली होती. त्यात कराड लोकसभा मतदार संघ रद्द होऊन सातारा लोकसभा हा जिल्ह्यात एकच मतदार संघ झाला. त्यामुळे शरद पवारांनी उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली आणि उदयनराजे खासदारही झाले. त्यानंतर 2013 साली शरद पवारांनी सिक्कीमच्या राज्यपालपदासाठी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची शिफारस केली. 2018 पर्यंत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. खासदार आणि राज्यपाल अशी दोन्ही ठिकाणची त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. सिक्किमचे राजभवन त्यांनी जनतेसाठी खुले केल्यामुळे ते 'पीपल्स गव्हर्नर' ठरले.

पाटण तालुक्याच्या या दोन्ही सुपुत्रांच्या राजकीय प्रवासाचा आलेख चढता राहिला आहे. आता झालेल्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत चव्हाण पुन्हा आमदार आणि पाटील खासदार झाले. 1999ला श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही दोघांमधील संबंध नेहमीच सौहार्दाचे राहिले. पक्षीय भेदापलिकडे त्यांनी आपले वैयक्तिक संबंध जपले. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे पाटण तालुक्याचे हे दोन्ही सुपुत्र हातात घालून प्रचार करताना दिसले. विजयानंतर श्रीनिवास पाटील यांनी आपले सुपुत्र सारंग याच्याबरोबर आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच, आ. पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नी सत्वशिला यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या..

हेही वाचा : ..अन् 'पीपल्स गव्हर्नरां'च्या मिशा ताठच राहिल्या..!

ABOUT THE AUTHOR

...view details