सातारा - दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या ( Karad Janata Cooperative Bank ) चार कर्ज खात्यांची ईडीकडून चौकशी ( Ed Inquiry ) सुरू झाली आहे. चारपैकी दोन कर्ज खाती कोरेगावातील जरंडेश्वर आणि सांगली जिल्ह्यातील रायगावच्या डोंगराई कारखान्याची आहेत. ईडी आता साताऱ्यात पोहोचल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन वर्षांपूर्वी बॅंकेचा परवाना झाला रद्द -दोन वर्षापूर्वी रिझ्व्ह बँकेने जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. त्यानंतर सहकार खात्याने बँक दिवाळखोरीत निघाल्याचे जाहीर केले होते. कर्ज वाटपामध्ये सहकार कायद्याच्या नियमांची पायमल्ली झाली आहे. तसेच मर्यादेपेक्षा अधिक रकमेची कर्जे देण्यात आली आहेत. विनातारण कर्जे दिल्यामुळे बॅंकेचा कारभार ईडीच्या रडारवर आला आहे.
चार कर्ज खात्यांच्या व्यवहारांची चौकशी -कराड जनता सहकारी बँकेने चार कर्जदारांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले होते. त्या चार कर्जदारांच्या थकीत कर्जाची रक्कम ५०० कोटींच्या आसपास आहे. बँकेला ती रक्कम वसूल करता आलेली नाही. या कर्जाच्या अनुषंगाने ईंडीकडून चौकशी सुरू आहे. बकिच्या मुख्य कार्यालयात ईडीचे दोन अधिकारी ठाण मांडून आहेत.
तत्कालीन अध्यक्षासह सीईओची दहा तास चौकशी - जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे ईडीने कर्जवसुलीच्या सद्यः स्थितीच्या अहवालाची तीन दिवसांपुर्वी मागणी केली होती. त्यानंतर ईडीचे दोन अधिकारी थेट कराडमध्ये दाखल झाले. बॅंकेच्या मुख्य शाखेत त्यांनी बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सूर्यवंशी ( CEO Vilas Suryavanshi ) यांच्याकडे तब्बल दहा तास चौकशी केली. बॅंकेत ईडीचे अधिकारी आल्याची माहिती दिवसभर कर्मचाऱ्यांना नव्हती. सायंकाळी त्यांना कुणकुण लागली.
हेही वाचा :Breaking: ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांचे 415 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त