महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2020, 7:08 PM IST

Updated : Nov 22, 2020, 7:37 PM IST

ETV Bharat / state

'पुणे शिक्षक-पदवीधर दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी शिवसेनेचा महत्वाचा वाटा असेल'

राज्यातील शिक्षक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात योग्य समन्वय असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. तसेच पुणे मतदारसंघातील दोन्ही उमेदवाराला निवडून आणण्यात शिवसेनेचा महत्वाचा वाटा राहिल असा विश्वास ही देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

shambhuraj desai
गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

सांगली- राज्यात सध्या शिक्षक व पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते प्रचार दौऱ्यात व्यस्त आहेत. दरम्यान पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील. यामध्ये शिवसेनेचा महत्वाचा वाटा असेल, त्यासाठी आमचे पदाधिकारी पूर्ण ताकदीने सज्ज आहेत, असा विश्वास गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला.

इस्लामपूर येथील मार्केटयार्ड परिसरातील शिवसेनेच्या जिल्हा पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार अजितराव घोरपडे, संपर्क प्रमुख नितीन बानूगडे-पाटील, जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार, संजय विभूते, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष प्रतिभा शिंदे व सुवर्णा मोहिते आदि नेतेमंडळी उपस्थित होते.

गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. तरी तो आमचा महाविकास आघाडी अंतर्गतचा प्रश्न आहे. यावर त्या-त्या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ, असे मतही शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महाआघाडीच-

मंत्री देसाई पुढे म्हणाले, शिक्षक व पदवीधरच्या पुणे मतदारसंघात पाचही जिल्ह्यात शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीतील उमेदवार अरुण लाड आणि प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. सर्वत्र शिवसेना, युवा सेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या तालुका कमिटी तयार केल्या आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी कार्यरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य स्तरावर तिन्ही पक्षाच्या आघाडी बाबत निर्णय होतील, आणि ते निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेवूनच होईल,असेही स्पष्टीकरण देसाई यांनी यावेळी दिले.

महाविकास आघाडीत समन्वय…!

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथील नाट्यगृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याबाबत विचारणा केली असता देसाई म्हणाले, 'आज आमच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा इस्लामपूर येथेच शिवसेना कार्यालयात होता, त्यामुळे अनुपस्थितीत होतो. आमची बैठक पूर्व नियोजित झालेली होती. तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांचा समन्वय आहे. दररोजचा आढावा एकमेकांना दिला जात आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आणू, असा विश्वासही मंत्री महोदय यांनी बोलून दाखवला.

Last Updated : Nov 22, 2020, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details