महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्तेचा माज आणू नका, अन्यथा पायात पत्रे ठोकल्याशिवाय राहणार नाही - राजू शेट्टी

सत्तेसाठी भाजपची चमचेगिरी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, की त्यांच्या बुडाखाली खुर्ची गेली की, त्यांना कुत्रही विचारणार नाही, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

By

Published : Mar 28, 2019, 1:52 AM IST

Raju Shetti

सांगली - देशात कायमस्वरूपी सत्तेचा ताम्रपट कोणालाही मिळाला नाही, त्यामुळे सत्तेचा माज आणू नका,अन्यथा एके दिवशी तुमच्या पायात पत्रे ठोकल्याशिवाय सोडणार नाही,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाला दिला आहे. तसेच भाजपची चमचेगिरी करणाऱ्यांच्या बुडाखालची खुर्ची गेल्यावर कुत्रं पण विचारणार नाही,असा टोला शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. सांगलीच्या येडेमच्छिंद्र येथे आयोजित लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

राजू शेट्टी हातकणंगले मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातून राजू शेट्टी यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम तसेच नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, राष्ट्रीय नेते रामपाल सिंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार सभेत राजू शेट्टी बोलताना

यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. या देशातील हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. कारण हा प्रश्न भविष्याचा आहे. या देशातील लोकशाही बुडवून नरेंद्र मोदी यांना हुकूमशाही आणायची आहे, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. तसेच ५ वर्ष देश मोदींच्या हातात होता. मात्र, मोदींनी देशावर ८२ हजार कोटींचे कर्ज केले आहे. या कर्जाचा हिशोब आता मोदींना जनतेला द्यावा लागेल, असेही ते म्हणाले. तर पुलवामा हल्ल्यावरूनही पाटील यांनी मोदींवर घणाघाती टीका केली.

या सभेत राजू शेट्टी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. २०१४ साली नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या जिवावर निवडून आले. मात्र, आता त्यांना शेतकऱ्यांची जाण राहिली नाही. तसेच जोपर्यंत तुमची वर्गणी येईल तो पर्यंत मी निवडणूक लढवत राहिल, ज्यावेळी पैसे येणे बंद होईल, त्यावेळी मी निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिकाही शेट्टींनी स्पष्ट केली.



ABOUT THE AUTHOR

...view details