रत्नागिरी -मच्छिमारी आणि आंबा व्यवसाय हे कोकणातील महत्त्वाचे व्यवसाय आहेत. यंदा पाऊस लांबल्याने आंबा हंगमा लांबणीवर पडला. फळांचा राजा अर्थात हापूस आंब्याचे उत्पादन ५० टक्के पेक्षाही कमी आहे. मात्र, या राजाला देखील कोरोनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मच्छीमारी आणि हापूस आंबा या दोन्ही व्यवसायांची हजारो कोटी रुपयांची उलढाल ठप्प झाली आहे.
ना ग्राहक, ना वाहतूक व्यवस्था; तयार आंबा होतोय खराब, आंबा उत्पादक शेतकरी संकटात सध्या आंबा तोडणीसाठी तयार आहे. मात्र, सध्या तयार झालेला आंबा झाडावरच लटकत आहे. आंबा काढून बाजारात पाठवला तरी संचारबंदीमुळे त्याला गिऱ्हाईक मिळत नाही. आंबा हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून रोज 1 लाख पेटी आंबा वाशीच्या मार्केटमध्ये जातो. मात्र, कोरोनामुळे 95 टक्याहून अधिक परिणाम या आंब्याच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे सध्या आंबा बागायतदार चिंतेत आहेत.
आंबा बागायतदारांनी जून 2019 पासून आंब्याच्या कलमाला विविध प्रकारे जपले. नियमित फवारणी, त्याला राखण करण्यासाठी ठेवलेल्या कामगारांवर लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, आता ज्यावेळी हापूस तयार होण्याची वेळ आली त्यावेळी या आंब्याला कोरोनाचे ग्रहण लागले. त्यामुळे या आंब्यावर उपजीविका करणाऱ्या 6 लाख लोकांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. आंब्याच्या बागेवर केलेला खर्च कसा वसूल होणार? असा मोठा प्रश्न आंबा बागायतदारांसमोर आहे.
ना ग्राहक, ना वाहतूक व्यवस्था; तयार आंबा होतोय खराब, आंबा उत्पादक शेतकरी संकटात तिन्ही जिल्ह्यांमध्ये आंबा बागायतदारांवर अंदाजे 1200 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे आंबा बागायतदार प्रसन्न पेठे सांगतात. पहिल्यांदा निसर्ग आणि आता कोरोनाचे संकट यामुळे सध्या आंब्याला ग्राहक नाही. दलाल आंबा विकत नाही. कोणी गाड्या उतरवून घ्यायला तयार नाही. आंबा काढायला परवानगी मिळाली. मात्र, काढून झालेल्या आंब्याला समोर विक्री व्यवस्था नाही. एयर कार्गो, सी कार्गो बंद असल्याने निर्यात पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे दररोज तयार होणाऱ्या आंब्याचे करायचे काय? असा मोठा प्रश्न आंबा बागायतदारांसमोर आहे. त्यामुळे जवळपास 2000 कोटींची उलाढाल ठप्प असल्याचे प्रसन्न पेठे सांगतात.
आंबा नाशवंत असल्याने त्याची जोखीम घेण्यास दलाल तयार नाहीत. त्यामुळे तयार झालेला आंबा झाडांवर लटकत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे पूर्णतः नुकसान होत आहे. उत्पादनच बाजारात विकले गेले नाही, तर हा माल नाशवंत असल्याने खराब होणार. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सध्या होत आहे.