रत्नागिरी -मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एसटी प्रवसाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी विभागामध्ये दररोज 600 ते 625 बसेस धावतात. चालक आणि वाचकांची दरवर्षी शारीरिक आणि डोळ्यांची तपासणी केली जाते. एखादा कर्मचारी महिनाभर गैरहजर असेल तर त्याला पुन्हा ट्रेनिंगला बोलावले जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने वारंवार सूचना दिल्या जातात, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली आहे.
काय आहे घटना? :इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ही घटना घडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. नदीच्या पुलावरील कठडा तोडून ही बस नदीपात्रात कोसळली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. इंदोरहून ही बस सकाळी साडेसात वाजता निगाली होती. खलघाट अणि ठीगरीमध्ये नर्मदा पुलावर येताच या बसचा अपघात झाला. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक), प्रकाश श्रावण चौधरी (वाहक) हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.