रायगड - विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आहेत. प्रत्येक उमेदवार घरोघरी फिरून आपल्या आश्वासनांचा पाढा वाचताना दिसतो आहे. लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. पण पनवेलमध्ये एक आवाज हळूहळू ऐकू येऊ लागलाय. No Water, No Vote आधी पाणी द्या मगच मतदान. पनवेलमधला ग्रामीण भाग असो किंवा मग शहरी भाग, कानाकोपऱ्यातून एकच घोषणा ऐकू येऊ लागली आहे. जर प्यायला पाणी नाही, मग वोट पण नाही.
पनवेलकरांना मेट्रो मिळाली पण पिण्याच्या पाण्यासाठी मात्र आजही आंदोलनं करावी लागत आहेत. सिडकोने वसवलेल्या पनवेलमधील अनेक वसाहती या पाणीटंचाईने वर्षभरापासून त्रस्त आहे. कधी एक तर कधी चार चार दिवसांआड होतो पाणीपुरवठा. २४ तास नळाकडे डोळे लावून बसावे लागते. त्यातही घरात पाणी आले नाही म्हणून नाईलाजास्तव खिशातून 1500 ते 2500 रुपये खर्च करून टँकरने पाणी मागवावे लागते. ही बाब टँकरमाफियांच्या पथ्यावर पडली आहे. विकासाच्या मोठं मोठ्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी कधी तरी या वसाहतीतही प्रचारफेरी करावी, ही लोक पाण्यासाठी किती त्रस्त आहेत. हे कळले, तरी आतापर्यंत पनवेलकरांनी आमदार, नगरसेवकांकडे तक्रार करूनही हा प्रश्न सुटत नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी आता थेट No Water, No Vote चा पवित्रा घेऊन थेट मतदानावरच बहिष्कार टाकला आहे.