रायगड - जिल्ह्यात अतिवृष्टीने रायगडमधील नद्यांना पूर आला आहे. महाड, माणगाव, पोलादपूर, श्रीवर्धन, अलिबाग, रोहा तालुक्यात सखल भागात पाणी साचले आहे. दरड कोसळून, रस्त्यावर पाणी साचून अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागोठणे येथील एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला असून, त्याचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे. महाड, माणगाव येथे अडकलेल्या दीडशे नागरिकांना प्रशासनाने सुरक्षास्थळी हलवले आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीने जिल्ह्यातील जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
रायगडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार, जनजीवन विस्कळीत जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. 4 ते 6 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. अतिवृष्टीसोबत सोसाट्याचा वाराही सुटला आहे. जिल्ह्यातील सावित्री, आंबा, कुंडलिका नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, रोहा, नागोठणे, पाली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. श्रीवर्धन माणगाव मार्गावरील घोणसे घाटात दरड कोसळून वाहतूक बंद झाली होती. मात्र, दरड काढल्यानंतर हा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. घोडनदी पुलावरून पाणी जात असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. काळ नदीवरील पूल कमकुवत असल्याने जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.महाडमधील सावित्री नदीला पूर आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी किनारी राहणाऱ्या 85 जणांना सुस्थळी हलविले आहे. महाडमध्ये अतिवृष्टीने अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. माणगावमधील सोन्याची वाडी येथील 55 जणांना प्रशासनाने सुखरूप हलविले आहे. पोलादपूर तालुक्यातील माटवण गावातील रस्त्यावर पाणी साचल्याने धारवली, सवाद, कालवली या गावाचा संपर्क तुटला आहे. माणगाव तालुक्यातील मौजे रीळे पाचोळे व निगळुन येथील रस्त्यावर पाणी साचल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
रायगडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार, जनजीवन विस्कळीत पूरस्थितीबाबत खबरदारी म्हणून महाड येथे मुरुडचे इंडियन कोस्ट गार्ड पथक बचाव साहित्यासह दाखल झाले आहे. पथकासोबत 2 अधिकारी, 10 जवान यांच्यासह ट्रक, बोट, लाईफ जॅकेट, लाईफ बोया, व्ही एच एफ सेट इत्यादी बचाव साहित्य आहे. स्थानिक पातळीवर साळुंखे रेस्क्यू टीम, महाडचे पथक, 5 बोटी, 18 स्वयंसेवक, 15 लाईफ जॅकेट्स, महाड नगरपालिकेच्या दोन बोटी असे बचाव साहित्यासह, बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. तर रोहा माणगाव येथे वाईल्डर वेस्ट अडव्हेंचर कोलाड पथक, बोटीसह तैनात ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून शासकीय यंत्रणांना, दरडग्रस्त, पूरग्रस्त नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.