महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 8, 2021, 5:37 PM IST

ETV Bharat / state

१० आणि ११ जून रायगडसाठी धोकादायक, अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज

१० आणि ११ जून रायगडसाठी धोकादायक आहे. या दोन दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Heavy rains are expected in Raigad on June 10 and 11
१० आणि ११ जून रायगडसाठी धोकादायक, अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज

रायगड - जिल्ह्यात १० आणि ११ जूनला अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यादृष्टीने खबरदारीची पावले उचलली आहेत. जिल्ह्यात १०३ दरडग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी शेल्टर होममध्ये हलविण्यात येणार आहे. त्याचबरोबर समुद्र किनारी, खाडी लगतच्या गावानाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टी काळात नदी, समुद्र, धरण परिसरात जाऊ नये, नागरिकांनी याकाळात घरातच राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगडकरांना केले आहे.

१० आणि ११ जून रायगडसाठी धोकादायक, अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज

१० आणि ११ जून रायगडसाठी धोकादायक -

रायगड जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचे आगमन झाले आहे. आज सकाळपासून काही भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. १० आणि ११ जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी, आणि 12 ते 20 किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे हे दोन दिवस रायगड करांसाठी धोकादायक ठरणार आहेत. अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील103 गावे दरडग्रस्त -

रायगड जिल्ह्यात महाड ४९, पोलादपूर १५, रोहा ३, म्हसळा ६, माणगाव ५, पनवेल 3, खालापूर ३, कर्जत ३, सुधागड ३, श्रीवर्धन २, तर तळा तालुक्यात १ असे १०३ गावे ही दरडीच्या सावटाखाली आहेत. अतिवृष्टी काळात येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचे संकेत दिले असल्याने या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थानिक प्रशासनाला हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अतिवृष्टी काळात नदी, समुद्र, धरण परिसरात जाऊ नका -

अतिवृष्टी काळात समुद्र, नदी, धरण याठिकाणी पावसाच्या पाण्याचा जोर जास्त असल्याने पाणी वाहते असते. याठिकाणी जाऊन काहीजण पोहण्याचा आनंद लुटण्यास जात असतात. अशावेळी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिवृष्टी काळात विशेषतः तरुणाईने याठिकाणी जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

समुद्र, खाडीकिनारी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश -

अतिवृष्टी आणि भरतीमुळे समुद्र, खाडी भागात किनाऱ्याला समुद्राचे पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. समुद्र, खाडी किनारी गावात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहावे असे आदेश दिले आहेत. अशावेळी सुरक्षितस्थळी हलण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन किंवा स्थानिक प्रशासनाकडे मदत मागण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. मुसळधार पावसात नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने बाहेर पडू नये असेही म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details