पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) ची लेखी परीक्षा उद्या 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण 14,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
एकूण परिक्षार्थींची संख्या: बारावीच्या बोर्ड परिक्षसाठी 7,92,780 विद्यार्थी 6,64,441 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10,388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3195 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थी संख्या: यंदाच्या या परीक्षेत विज्ञान शाखेतून 6,60,780 विद्यार्थी, कला शाखेत 4,04,762, वाणिज्य शाखेत 3,45,532, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) मध्ये 42,959,आणि टेक्निकल सायन्स (ITI) शाखेत 3261 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परीक्षेची ठळक वैशिष्टये: फेब्रुवारी-मार्च 2023 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्यात आलेली असून सरल डेटावरून कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी कालपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2023 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य घरावे.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती: फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचे वेळापत्रक 30 डिसेंबर रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
असे असतील नियम: परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परीक्षा केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोर्बाइलमध्ये करावयाचे आहे. तसेच संपूर्ण केंद्रपरिसराचे चित्रीकरण करावयाच्या सूचना या परीक्षेपासून संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (स्नर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.