पुणे:याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सोमनाथ सुनिल सुळ (वय 25 वर्षे), गणेश बापुराव महानवर (वय 30 वर्षे, दोघे रा. केसनंद फाटा वाघोली ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी व आरोपी सोमनाथ हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहे आणि एकाच गावातील आहेत. पूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र, सोमनाथ याच्या स्वभावावरून दोघांमध्ये सतत भांडण होत होते. त्यांच्यात सतत वाद होत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते. ही घटना 18 ते 19 फेब्रुवारी रोजी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग, अपहरण, जीवे ठार मारण्याची धमकी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तिला शोधत थेट कंपनीत पोहोचला: अलीकडच्या कालावधीत तरुणीचे लग्न झाले. मात्र काही दिवसानंतर तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती वेगळी राहत होती. त्यामुळे सोमनाथ हा तिच्यासोबत संपर्क करत होता. तरुणी शहरातील एका खासगी कंपनीत काम करते. सोमनाथ तिच्या शोधासाठी थेट तिच्या कंपनीत एकेदिवशी गेला होता. कंपनीतील लोकांनी फिर्यादी तरुणीच्या फोनवर संपर्क करून अशीअशी व्यक्ती भेटण्यासाठी आल्याचे कळविले होते. त्यानंतर तरुणीने तो घरी येऊ नये, म्हणून त्याला स्वारगेट येथील जेधे चौकात भेटण्यासाठी शनिवारी रात्री पावने दहा वाजताच्या सुमारास बोलविले.
पोलिसांकडून दोघांना अटक:त्यावेळी सोमनाथने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने तिचे चारचाकी गाडीतून अपहरण केले. तेथून तिला वाघोली जेजूरी असे फिरवून दुसर्या दिवशी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास सदाशिव पेठेत सोडले. यावेळी सोमनाथ याने तरुणीने त्याच्यासोबत लग्न केले नाही तर तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.