महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अगडबम!!! ३०० किलोंहून ८६ किलो, आशियातील सर्वाधिक लठ्ठ महिला अशी झाली बारीक

अमिता जेंव्हा सहा वर्षाच्या होत्या तेंव्हापासून त्यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते. आपले दैनंदिन कामेसुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. भारत आणि यूकेमधील आघाडीच्या एंडोक्रिनोलॉस्ट्सनासुद्धा त्यांच्या स्थूलपणाचे नक्की कारण सापडत नव्हते.

By

Published : May 8, 2019, 5:33 PM IST

Updated : May 8, 2019, 7:10 PM IST

आशियातील सर्वाधिक लठ्ठ महिला अशी झाली बारीक

पालघर - वयाच्या सहाव्या वर्षापासून वजन वाढण्याची समस्या असलेल्या एका महिलेचे वजन आशियातील सर्वाधिक ठरले. ३०० किलो वजन असलेल्या या महिलेचे वजन ८६ किलो इतके करण्यात यश आले. वजन कमी करण्यासाठी मोलाचे सहाय्य करणाऱया डॉक्टरांनी ही घटना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची तयारी सुरु केली आहे.

वसई येथे राहणाऱ्या ४२ वर्षांच्या अमिता राजानी यांचे वजन ३०० किलो होते. त्या आशियातील सर्वाधिक वजन असलेल्या महिला होत्या. चार वर्षापूर्वी त्यांच्यावर बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांचे वजन ८६ किलो आहे. या लढ्यामध्ये प्रसिद्ध बेरिअॅट्रिक सर्जन आणि लॅपरो ओबेसो सेंटरचे संस्थापक तसेच लिलावती रिसर्च सेंटर व हिंदुजा रूग्णालय खार येथील डॉ. शशांक शहा यांनी मदत केली.

अमिता जेंव्हा सहा वर्षाच्या होत्या तेंव्हापासून त्यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते. आपले दैनंदिन कामेसुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. भारत आणि यूकेमधील आघाडीच्या एंडोक्रिनोलॉस्ट्सनासुद्धा त्यांच्या स्थूलपणाचे नक्की कारण सापडत नव्हते.

जेव्हा त्यांचे वजन ३०० किलोपर्यंत पोहोचले, तेंव्हा परिस्थिती अजूनच गंभीर झाली होती. त्यांना घराबाहेर पडणेही शक्य नव्हते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांची खूप काळजी वाटत होती. कारण चालण्यापासून सगळ्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी त्यांना मदतीची गरज लागत होती. अशातच अमिता यांना श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनचा सपोर्ट लागत असे. शस्त्रक्रियेच्या आधी ८ वर्षे त्या झोपूनच होत्या.

लॅपरो ओबेसो सेंटरमधील डॉ. शंशांक शहा यांची त्यांनी भेट घेतली तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. त्यांनी अमिता यांना लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. याच कारणासाठी अनेक वर्षांनी त्या घराबाहेर पडल्या. त्यांना अतिस्थूलपणाचा विकार होताच. त्याचबरोबर त्यांच्या कोलेस्टरॉलची पातळी असंतुलित होती. मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाला होता. टाईप २ प्रकारचा मधुमेह आणि श्वसनाच्याही समस्या होत्या.

रुग्णवाहिकेचे काढावे लागले होते दरवाजे

शस्त्रक्रियेपूर्वी दोन महिन्यांची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी एक विशेष रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली होती. त्या रुग्णवाहिकेचे दरवाजे काढले होते आणि एक साडेसहा फुटांचा सोफा रुग्णवाहिकेत बसविण्यात आला होता. जेणेकरून त्यांना हॉस्पिटलमध्ये आणता येईल. हॉस्पिटलमध्ये त्यांना विशिष्ट आहार घेण्यास सांगितला होते. त्यांच्यासाठी खास बेड, कपडे, वजन करण्याचे मशीन ठेवण्यात आले होते. त्यांची शस्त्रक्रिया २ टप्प्यांमध्ये पार पडली.

२०१५ साली त्यांच्यावर पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे वजन कमी झाले आणि त्या स्वतःहून चालू लागल्या. २०१७ साली अमिता यांच्यावर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांचे वजन १४० किलो होते.

स्थलपणा आहे गंभीर आजार

डॉ. शशांक शहा म्हणाले, "कर्करोग किंवा एचआयव्हीएवढाच स्थूलपणा हा गंभीर आजार आहे. स्थूलपणा हा सगळ्या आजारांचे हे मूळ असते. पुरुषांच्या तुलनेने महिलांना हा आजार अधिक प्रमाणात होतो. कारण महिलांमध्ये प्रसूती किंवा रजोनिवृत्तीसारखी शारीरिक कारणे असतात. पुरुषांमध्ये अॅबडॉमिनल ओबेसिटी म्हणजेच पोटाकडील भागाचा स्थूलपणा असतो. पोटाच्या भागात स्थूलपणा वाढल्यामुळे कोलेस्टरॉल, मधुमेह आणि हृदयविकारांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे महिलांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक वजन असणे हे भावनिकदृष्ट्या अधिक त्रासदायक असते. मधुमेह, मूत्रपिंडाचा विकार, रक्तदाब किंवा अतिरिक्त कोलेस्टरॉलमुळे जीव गमवावा लागलेल्या व्यक्तींमध्ये स्थूलपणा हे मूळ कारण होते.

"भारतातील प्रत्येक पाचव्या व्यक्तीचे वजन प्रमाणापेक्षा थोडे अधिक असते. पण गेल्या दशकापासून भारतातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचे वजन प्रमाणापेक्षा अधिक झाले आहे. पर्यावरणीय घटकांमुळे चयापचयावर परिणाम झाला आहे. स्थूलपणा हा जणू काही साथीचा रोग झाला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या प्रवृत्तीला चालना मिळते. वातावरणीय घटक या आजाराला कारणीभूत ठरतात. अंतःस्त्रावी यंत्रणेवर परिणाम झाल्याने हा आजार बळावतो. अमिता यांच्यासारख्या काही प्रकरणांमध्ये हा असंतुलितपणा गंभीर स्वरुप धारण करतो. पण आज, शस्त्रक्रियेच्या चार वर्षांनंतर त्या मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर आहेत. त्यांचे मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करत आहे आणि त्यांना आहाराचे पथ्य पाळण्यास सांगितले आहे. आता आम्ही अमिताची केस लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नात आहोत.", अशी पुष्टी त्यांनी जोडली.

आईने सांगितली दैनंदिनी

अमिताची आई ममता राजानी म्हणाल्या, "अमिताची काळजी घेताना मी खूप समस्यांना सामोरे गेले. माझ्या मुलीला अशा अवघडलेल्या परिस्थितीत बघून मला किती यातना होत होत्या हे मी शब्दांत सांगू शकत नाही. अमिता अजिबात हलू शकत नव्हती. त्यामुळे तिचे कपडे बदलणे, तिला खाऊ घालण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत मला करावी लागे. तिच्या शरीरातून बाहेर पडणारे स्त्रावसुद्धा टॉवेल आणि बेडशीटमध्ये शोषून घेतले जात असते. त्याचप्रमाणे तिला हालचाल करण्यासाठीही मदत करावी लागत असे. अखेर आमची प्रार्थना ऐकली आणि अमिताचा बांधा आता व्यवस्थित झाला आहे. या संपूर्ण लढाईत डॉ. शहा आमच्यासोबत होते आणि हे सगळे त्यांचेच श्रेय आहे."

आनंदित झालेल्या अमिता राजानी म्हणाल्या, "आधी मी खाटेला खिळलेली होते आणि आता मी स्वतंत्र आहे आणि मुक्तपणे हालचाल करू शकते. मी माझ्या आवडीचे कपडे घालू शकते आणि मला हवे तसे आयुष्य जगू शकते. माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही.

Last Updated : May 8, 2019, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details