पालघर - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. यामुळे कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातही क्योर चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात क्योर चक्रीवादळाचा प्रभाव पाहता नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
पालघरमधील मत्स्यव्यवसाय विभागाच्या 1 हजार 411 बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 378 बोटी समुद्रकिनारी परतल्या आहेत. 33 बोटी समुद्रात असून त्यांनाही समुद्र किनारी परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रशासनामार्फत त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.