महाराष्ट्र

maharashtra

'वायू' चक्रीवादळ ठरु शकते धोकादायक; किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा

By

Published : Jun 11, 2019, 7:06 PM IST

'वायू' चक्रीवादळाचा राज्यात धडकण्याचा धोका कमी असला तरीही त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढू शकतो.

'वायू' चक्रीवादळ

पालघर- लक्षद्वीप बेटांजवळ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास लक्षद्वीप बेटाच्या वायव्य दिशेला २०० किमी दूर या वादळाचा केंद्रबिंदू होता. 'वायू' चक्रीवादळ मुंबईपासून साधारणतः ८४० किमी दूरवरुन नैऋत्य दिशेने जाणार आहे. तसेच हे वादळ गुजरातपासून १०२० कि.मी दुरून जाणार आहे. त्याची तीव्रता पुढील १२ तासांत वाढणार असून ते वायव्य दिशेला वळणार असल्याचे भाकित वर्तविले गेले आहे.

'वायू' चक्रीवादळ

'वायू' चक्रीवादळाचा राज्यात धडकण्याचा धोका कमी असला तरीही त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढू शकतो. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल व या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

वादळ प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या किनारपट्टी जवळून जाणार नसले तरी किनारपट्टीलगत असलेल्या भागात व गावात याचा धोका उद्भवू शकतो. खबरदारी म्हणून पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मच्छीमारांनी आपल्या बोटीला बांधलेले दोरखंड अजून मजबूत करण्याच्या दृष्टीने अन्य उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या न गेल्यामुळे मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details