उस्मानाबाद - जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे मातब्बर डॉ. पद्मसिंह पाटील घराणे भाजपत गेले. त्यानंतर लगेचच भाजपसोबत बरोबरी करत शिवसेनेने काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना शिवसेना प्रवेश दिला आहे. भाजप आणि शिवसेनेची सुरू असलेली ही रस्सीखेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
हेही वाचा - पाटील घराणे भाजपात गेल्याने राष्ट्रवादीचे किरकोळ नुकसान -जीवन गोरे
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडेंसह काही नेत्यांनी मातोश्रीवरती जाऊन हातामध्ये शिवबंधन बांधले. प्रशांत चेडे यांनी काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांसह राजीनामे दिले आहेत. शिवसेनेने काँग्रेसचा जिल्ह्यातील सेनापतीच फोडल्याने भूम परंडा आणि वाशी तालुक्यात काँग्रेसचा गड ढासळला आहे. काँग्रेसच्या चेडे परिवाराचे परंडा मतदारसंघात मोठे प्रस्थ आहे. पंचायत समिती, नगर पालिका आणि बाजार समिती यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्था चेडेंच्या ताब्यात आहेत. मात्र, आता त्यावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आमदार राणा जगजित सिंह वडिलांसह करणार भाजपमध्ये प्रवेश
उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे परंडा तालुकाध्यक्ष सुभाषसिंह सिद्धीवाल, भूमचे अण्णासाहेब देशमुख आणि विजयसिंह थोरात, वाशीचे विभीषण खामकर, जिल्हा परिषद सदस्य जयश्री खंडागळे आणि सुनील जाधवर, वाशीचे नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि बाजार समितीच्या अनेक संचालकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.