नाशिक - समृद्धी महामार्गासाठी मुरुम आणि दगड काढल्यानंतर तयार झालेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या २ महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील कोनांबे परिसरात ही घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा -नालासोपाऱ्यात उघड्या गटारात पडून ६ वर्षीय चिमुकला गेला वाहून, शोधकार्य सुरू
सिन्नर तालुक्यातील कोनांबे शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गासाठी खडीचे उत्पादन देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यासाठी लागणारा दगड आणी माती जमिनीतून काढल्याने या भागात तळे तयार झाले होते. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने हा खडा पूर्णपणे पाण्याने भरला.
हेही वाचा - हरतालिका विसर्जन करताना चार जण नदीत बुडाले; एका महिलेचा मृत्यू तर 3 जण बेपत्ता
दरम्यान, या खड्ड्यात सोनांबे येथील विजय वारुंगसे व गणेश वारुंगसे हे 2 युवक पोहण्यासाठी गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले.यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या चुलत भावाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून समृद्धी महामार्गाच्या कामावरील सुरक्षारक्षक धावत आला. मात्र, त्यापूर्वी दोघे बुडाले होते.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमक दलाचे जवान व येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांनी शोध मोहिम केली. त्यानंतर सुमारे २ तासाच्या प्रयत्नानंतर या दोघांचे मृतदेह हाती लागले.