महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रशासनाचा दिखावा? पालक सचिवांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी सिन्नरमध्ये रातोरात सुरू केल्या चारा छावण्या

चारा छावण्यांचे अनुदान सरकारने तातडीने द्यावे, अशी मागणी राज्यातील छावणी चालकांनी केली होती. मात्र, ती मागणी शासन दरबारीतील लालफितीत अडकून राहिली. त्यानंतर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पालक सचिवांच्या दौऱ्यात प्रशासनाकडून केवळ दिखावा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

By

Published : May 16, 2019, 6:29 PM IST

Updated : May 16, 2019, 7:54 PM IST

चारा छावणी

नाशिक- राज्याच्या पालक सचिवांना दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर आज नाशिकचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी सिन्नरचा दौरा केला. मात्र, या दौर्‍याच्या धास्तीमुळे येथील प्रशासनाने एका रात्रीतच चारा छावण्या उभ्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, अनेक शेतकर्‍यांनी तर स्व:खर्चाने जनावरांसाठी तात्पुरता आसरा उभा केल्याचेही वास्तव समोर आले आहे. त्यामुळे सरकारी अधिकार्‍यांच्या आणि पालक सचिवांचा हा दौरा दिखावा असल्याची चर्चा सध्या सिन्नरमध्ये सुरू झाली आहे.

पालक सचिवांचा दुष्काळी दौरा
जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुटे हे आज सिन्नरमध्ये दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तालुक्यात गुळवंची गावात एका रात्रीत चारा छावणी उभी केली. मात्र, स्वतःच्या हाताने खड्डे खोदून शेतकऱ्यांनी स्व:खर्चाने जनावरांसाठी या ठिकाणी सावली निर्माण केल्याचे वास्तव आहे. कोणतीही साधन सामुग्री नसताना केवळ पाणी आणि चाऱ्यासाठी या ठिकाणी हे शेतकरी शेड उभा करत आहेत.

चारा छावण्यांचे अनुदान सरकारने तातडीने द्यावे, अशी मागणी राज्यातील छावणी चालकांनी केली होती. मात्र, ती मागणी शासन दरबारीतील लालफितीत अडकून राहिली. त्यानंतर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पालक सचिवांच्या दौऱ्यात प्रशासनाकडून केवळ दिखावा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या संपूर्ण भागात एकूण आठ हजार जनावरे होती. मात्र चारा आणि छावण्या नसल्याने अनेकांनी आपली जनावरे कवडीमोल भावात विकली असल्याची व्यथा येथील काही शेतकऱ्यांनी सांगितली. चारा छावण्यासाठी अर्ज करणाऱ्याच्या फाईली अनेक दिवस पडून होत्या. सुरुवातील आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर सुट्टीचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, छावण्यांना परवानगी देण्यात आली नाही. मात्र आता पालक सचिवांच्या दौऱ्यापूर्वी अचानकच शेतकऱ्यांच्या फायली मंजूर करण्यात आल्या, अवघ्या काही तासातच छावण्याही सुरू झाल्या. मग पालक सचिवांचा दौरा होण्यापूर्वी हे सर्व का नाही झाले, असा प्रश्न येथील शेतकरी विचारत आहेत.

Last Updated : May 16, 2019, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details