महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 18, 2020, 6:21 PM IST

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नाशिक जिल्ह्यात दररोज 300 ते 400 बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोग्य प्रशासनावर देखील ताण वाढला आहे. अशा संकटाच्या काळातही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे.

Nashik Agricultural Market
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

नाशिक -जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही नाशिकच्या कृषी उपन्न बाजार समितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला पायदळी तुडवले जात आहे. त्यामुळे बाजार समिती येणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपिल भास्कर यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट...

नाशिकच्या कृषी उपन्न बाजार समितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला पायदळी तुडवले जात आहे

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. तर आत्तापर्यंत 366 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सर्वाधिक बाधित रूग्ण हे नाशिक शहरातील आहे. नाशिक जिल्ह्यात दररोज 300 ते 400 बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोग्य प्रशासनावर देखील ताण वाढला आहे. अशा संकटाच्या काळातही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे.

बाजार समितीच्या प्रवेशद्वारवरच नियम धाब्यावर -

नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो शेतकरी शेतमाल घेऊन येतात. बाजार समितीच्या प्रवेशद्वारवर येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे तापमान मोजणे आणि सॅनिटाईज करणे आवश्यक असताना त्याचा येथे अभाव दिसत आहे. येणाऱ्या वाहनांना बाजार समितीची पावती फाडून थेट आत प्रवेश दिला जात आहे.

शेतमाल लिलावा दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा -

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच वेळी शेतकरी तसेच किरकोळ भाजी विक्रेत्यांची गर्दी होऊ नये म्हणून किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, तरीही शेतमाल लिलावादरम्यान शेतकरी व व्यापाऱयांची मोठी गर्दी होत आहे. बाजार समितीकडून वारंवार लाऊड स्पीकरवर सूचना दिल्या जात असूनही याकडे शेतकरी व व्यापारी सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत.

गर्दी टाळण्यासाठी बाजार समितीकडून वेळापत्रक -

बाजार समितीमध्ये एकाच वेळी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यात वेळ आणि शेतीमालाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

कोबी,फ्लॉवर - सकाळी 11 ते दुपारी 2, दुपारी 4 ते सायंकाळी 6.

वांगे, काकडी, ढोबळी मिर्ची, भोपळा, दोडके गोलके इतर फळभाज्या -

सकाळी 11 ते दुपारी 2.

गाजर, वाटाणा, आले, मिर्ची, घेवडा - दुपारी 4 ते रात्री 8 .

पालेभाज्या - सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत.

कृषी उत्पन्न बाजार समितीत डॉक्टरची नेमणूक -

काही दिवसांपूर्वी बाजार समितीमध्येसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधीत करून चार दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून डॉक्टर शलोना सय्यद यांची कायमस्वरूपी बाजार समितीमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. येणाऱ्या शेतकऱ्यांना आरोग्याबाबत अडचण असल्यास डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच डॉ. सय्यद शेतकऱयांना कोरोनाबाबत जागृक देखील करत आहेत.

आम्ही शासनाच्या सर्व नियमांचे पालन करतो - सचिव

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आम्ही शासनाच्या नियमांचे पूर्ण पालन करत आहोत. बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान घेतले जाते, मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच एका वाहनात दोनपेक्षा अधिक व्यक्तींना मनाई करण्यात आली आहे. बाजार समितीमध्ये फक्त ठोक व्यवहार सुरू असून किरकोळ विक्रेत्यांना मनाई करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत वारंवार लाऊडस्पीकरवर सूचना दिल्या जात आहेत. शेतमाल विक्रीचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी डॉक्टरची नेमणूक करण्यात आली आहे, असे बाजार समिती प्रशासनाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details