नांदेड- जंगल भागातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने आता वन्य प्राणी मानव वस्तीकडे धाव घेत आहेत. २२ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथे एका मादी जातीच्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा त्या घटना स्थळापासून जवळपास ३० मीटर अंतरावर २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरामुळे वन्य प्राण्याची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याचे चित्र समोर आले आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर....!
जंगल भागापासून जवळपास ७ ते ८ कि. मी. अंतरावरील मोतीराम जोधा राठोड यांच्या शेतात २२ एप्रिल रोजी वर्षाच्या मादी बिबट्या मृतदेह आढळून आला होता. या घटनेच्या एक दिवसानंतर त्याच घटनास्थळापासून अंदाजे ३० मीटर दूर २३ एप्रिल रोजी नर जातीच्या बिबट्याचा ज्वारीच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला. नेमका या बिबट्याचा मृत्यू कशाने झाला? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून आता जंगल भागातील पाण्याचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
वन विभागाकडून दुजोरा....!
दुसऱ्याही बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या माहितीला वन विभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे. रात्रीची वेळ असल्याने घटनास्थळाचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.