नागपूर : शहरातील प्रसिध्द टेकडी उड्डाणपूल पाडण्याच्या कामास बुधवार पासून सुरवात होत आहे. 812 मीटर लांब आणि 10.5 मीटर रुंद असलेला हा उड्डाणपूल 2008 मध्ये 16.23 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता. उड्डाणपुलाखाली एकूण १७५ दुकाने बांधण्यात आली होती, परंतु जयस्तंभ चौक परिसरातील वाहतूकीची रोज उद्भवणारी कोंडी लक्षात घेता व वाहतुक समस्या सोडवण्यासाठी जयस्तंभ चौकाच्या आजूबाजूच्या रस्त्याच्या परिसरात बदल करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लोहा पुलाजवळ रेल्वे-अंडर-ब्रिज तर किंग्जवे येथे वाय शेप उड्डाणपूल प्रस्तावित आहे. येथिल उड्डाणपूल पाडून तेथे पुन्हा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्हीएनआयटीच्या अहवालानुसार:या कामाचा अहवाल 2018 मध्ये सादर करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण काम महा मेट्रोला डिपॉझिट वर्क तत्त्वावर देण्यात आले. त्यानुसार किंग्जवे फ्लायओव्हर आणि आरयूबी बांधण्यात आले. रेल्वे स्थानकासमोरील सध्याचा उड्डाणपूल पाडून जयस्तंभ आणि मानस चौकला जोडणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करणे आवश्यक आहे त्यामुळे तो पाडण्यात येत आहे.
महामेट्रोने बांधली १११ दुकाने : उड्डाणपूलखाली काम करणाऱ्या दुकानदारांना सामावून घेण्यासाठी महामेट्रोने १११ दुकाने बांधली आणि ती दुकाने त्यांना वाटपासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. दुकानदारांनी कायदेशीर हस्तक्षेपाची मागणी केली होती. ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यास विलंब झाला मात्र, उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांनी आता तयारी दाखवल्या नंतर महापालिकेने उड्डाणपूल पाडण्याची तयारी दर्शवली.