नागपूर -पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या गृहमंत्रायलाने राज्यातील काही प्रमुख आणि ऐतिहासिक कारागृहात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 26 जानेवारीपासून पुणे येथील येरवडा कारागृहामध्ये पर्यटन सुरू केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. म्हणजेच तुम्ही जर सर्वसाधारण व्यक्ती असाल तर केवळ पन्नास रुपयांमध्ये तुम्हाला क्रूरकर्मा कसाबला फाशी दिलेले कारागृह पाहता येणार आहे.
प्रजासत्ताक दिनी उद्घाटन
एखाद्या कारागृहात पर्यटन सुरू करण्याची ही देशातील पहिलीच घटना असणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून या पर्यटनाला सुरुवात होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईवरून तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातून आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे गोंदिया येथून या पर्यटनाचा शुभारंभ ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात येरवडा जेलमध्ये पर्यटन सुरू होईल. यामध्ये शाळेतील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला इतिहास जाणून घेता येणार आहे. राज्यात एकूण 45 ठिकाणी 60 कारागृहात त्यामध्ये तब्बल 24 हजार कैदी विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहेत तर 3 हजार कैद्यांना इतरत्र ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
येरवडा कारागृहाचा इतिहास
भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा कारागृहासह राज्यातील ठाणे नाशिक, धुळे, रत्नागिरी यासारख्या महत्त्वाच्या कारागृहांमध्ये कैद केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल ,सरोजिनी नायडू आणि सुभाष चंद्र बोस या थोर नेत्यांना इंग्रजांनी येरवडा कारागृहात कैद करून ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणी स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पुणे करार हा देखील येरवडा कारागृहातच झाला होता. ते ठिकाण आता गांधी यार्ड म्हणून प्रचलित आहे. पुणे करार ज्या आंब्याच्या झाडाखाली झाला त्या झाडाचा देखील जतन करण्यात आलेला आहे. त्याची योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. 1899 मध्ये चापेकर बंधूंना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली होती. तसेच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिद्ध जिंदा आणि सुखा यांनादेखील येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली होती. याशिवाय 26/11 ला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला देखील येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात महत्त्वाचा कारागृह म्हणून येरवडा मध्यवर्ती कारागृह याची नोंद होते. म्हणूनच पहिले पर्यटन केंद्र म्हणून येरवडा कारागृहची निवड करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.