मुंबई : मुंबईमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या आपत्कालीन घटना घडतात. या घटना घडल्यावर त्वरित मदत पोहचावी म्हणून आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. कॉलेजचे विद्यार्थी घटनास्थळी त्वरित पोहचून नागरिकांना लागणारी मदत करत असल्याने याचा फायदा मुंबईकरांना होत आहे. यामुळे "आपदा मित्र" संकल्पना यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.
नेमका काय आहे उपक्रम :मुंबईमध्ये आगी लागणे, इमारत घर दरडी कोसळणे, रस्त्यावर अपघात आदी दुर्घटना घडत असतात. अशा दुर्घटनास्थळी बचाव पथके पोहचतात. परंतु त्याआधी आजूबाजूच्या राहणाऱ्या नागरिकांनी मदत केल्यास अनेकांचे जीव वाचवता येऊ शकतात. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण नागरिकांना, शाळेतील मुलांना दिले जात आहे. त्याचसोबत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही हे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना "आपदा मित्र" म्हणून ओळखले जाते.
आपत्कालीन परिस्थितीत मदत : करीरोड रेल्वे स्थानकाजवळ एका मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन प्रवाशांचा अपघात झाला होता. बघ्यांची गर्दी होती. या ठिकाणाहून आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी जात होते. त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी त्वरित ऍम्ब्युलन्स आणि पोलिसांना माहिती दिली. या दोघांना रुग्णालयात भरती करण्यास मदत केली. त्याचप्रमाणे दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क मैदानात एक ५७ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. हा व्यक्ती त्याच ठिकाणी कोसळला. या व्यक्तीला त्वरित विशाल वाघचौरे नावाच्या आपदा मित्राने प्रथोमपचार देऊन त्या व्यक्तीला एम्बुलन्स बोलावून सायन रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मालाड येथे झोपड्याना मोठी आग लागली होती. त्यावेळीही आपदा मित्रानी नागरिकांना मदत केली होती.