मुंबई -मुंबई महापालिकेद्वारे धारावी येथे जल जोडणीचे काम ६ आणि ७ नोव्हेंबरला हाती घेतले जाणार असल्यामुळे धारावी व वांद्रे टर्मिनस विभागातील पाणी पुरवठा या दोन्ही दिवशी बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेद्वारे ही माहिती देण्यात आली.
हेही वाचा -पीएमसी बँक घोटाळ्यामुळे आणखी एका महिला खातेदाराचा बळी
मुंबई महापालिकेतर्फे ‘जी/उत्तर’ विभागातील धारावी येथे ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी तसेच १४५० मिलीमीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी यांच्या जल जोडणीचे काम बुधवारी ६ नोव्हेंबरच्या दुपारी १२ वाजल्यापासून गुरुवारी ७ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजेपर्यंत १६ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.
या कामामुळे ६ नोव्हेंबरला धारावी मधील धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदीर रोड, दिलीप कदम मार्ग व कुंभारवाडा आदी परिसरात सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच वांद्रे टर्मिनस परिसरात ६ नोव्हेंबरला दुपारी १२ ते ७ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही. नागरिकांनी अगोदरच्या दिवशीच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पूरेसा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.