मुंबई -राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, भाजी आणि फळ विक्री करण्यास आता पालिकेने परवानगी दिली आहे. विक्रेते आणि ग्राहक यांनी सोशल डिस्टंन्सिंग नियम पाळून विक्रेत्यांना निर्धारित वेळेत फळे, भाजी विकण्यास अनुमती देण्यात आली आहे. मात्र, अंतर ठेवण्याचा नियम भंग केल्यास दुकाने बंद केली जातील, असा आदेश पालिका आयुक्तांनी दिला आहे. भाजी विक्रेत्यांमधील अंतर हे किमान २० फूट तर, ग्राहकांना आपआपसात किमात साडेतीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे.
सोशल डिस्टंन्सिंग नियम पाळून मुंबईत रोज मिळणार भाजी; विक्रेत्यांमध्ये 20 फुटांचे तर ग्राहकांमध्ये 3 फुटांचे अंतर
महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे निर्देश दिले.
महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे निर्देश दिले. भाजी फळे विक्रेत्यांना ठिकाण ठरवून देणे, वेळ ठरवून देणे, नियमांची माहिती देणे व सदर नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करणे, इत्यादी सर्व बाबतचे नियोजन व्यवस्थापन हे महापालिकेच्या विभागस्तरीय 'सहाय्यक आयुक्त' यांच्या स्तरावर केले जाणार आहेत. यासाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक यांचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रातील नागरिक दैनंदिन गरजेच्या भाजी, फळे इत्यादी खाद्य विषयक खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मंडईत किंवा एकाच परिसरात ठराविक वेळी काही प्रमाणात गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यामुळे कोरोना संसर्गाची संभाव्यता वाढू शकते. हे टाळण्यासाठी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे पर्याय तात्पुरत्या स्वरूपात वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार दोन भाजी विक्रेत्यांमधील अंतर हे किमान वीस फूट असेल याची काळजी घेणे आलश्यक आहे. तसेच सदर ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना आपापसात किमान साडेतीन फूट (१ मीटर) अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सदर ठिकाणी पुरेशी जागा असल्याची खातरजमा झाल्यानंतरच तात्पुरत्या स्वरूपातील भाजी विक्रेत्यांना निर्धारित वेळेत फळे, भाजी विकण्यास अनुमती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन विक्रेत्यांमधील किमान अंतर व दोन ग्राहकांमधील किमान अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्यास सदर दुकाने तात्काळ हटविण्यात येणार आहेत.