महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत वर्षभरातील दुर्घटनांमध्ये १७९ जणांचा मृत्यू, ७२२ जण जखमी

By

Published : Feb 21, 2020, 9:10 PM IST

Updated : Feb 22, 2020, 12:06 AM IST

मुंबईत दुर्घटनांचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील वर्षभरात मुंबईत तब्बल १३ हजार १५० दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली आहे. त्यात १७९ जणांचा मृत्यू झाला असून, ७२२ जण जखमी झाले आहेत.

This Year one hundered seventy nine people die in accidents in Mumbai
मुंबईत वर्षभरातील दुर्घटनांमध्ये १७९ जणांचा मृत्यू

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर म्हणवल्या जाणाऱ्या मुंबई शहरात रोजच दुर्घटना घडत असतात. मुंबईत दुर्घटनांचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील वर्षभरात(2019) मुंबईत तब्बल १३ हजार १५० दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली आहे. त्यात १७९ जणांचा मृत्यू झाला असून, ७२२ जण जखमी झाले आहेत. आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळून मृत्यू झाल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मुंबईत वर्षभरातील दुर्घटनांमध्ये १७९ जणांचा मृत्यू

मुंबईत आगी लागण्याचे प्रमाण वाढत आहे. पावसाळ्यात झाडे पडणे, घर, घरांच्या भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, गॅस गळती होऊन सिलेंडर स्फोट तसेच नाले, मॅनहोल, नदी, समुद्र- खाडी, विहीर, खदानी, पूल, मॅनहोलमध्ये पडून, रस्त्यावर अपघात अशा दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये गेल्या १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३ हजार १५० दुर्घटना घडल्या. यात १७९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर ७२२ जण जखमी झाले. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांना दिलेल्या माहिती अधिकारातून हे समोर आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद

मागील वर्षभरात मुंबईत आग आणि शॅार्टसर्किटच्या ५ हजार २५४ घटना नोंद झाल्या आहेत. या घटनेमध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला असून, २१६ जण जखमी झाले आहेत. घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या १ हजार ३ दुर्घटनेत एकूण ५७ जणांचा मृत्यू झाला असून, २९९ जण जखमी झाले आहेत. झाडे, झाडांच्या फांद्या पडण्याच्या ४ हजार ९३७ दुर्घटना नोंद झाल्या आहेत. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून, ४२ जण जखमी झाले आहेत. समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडण्याच्या १२८ दुर्घटना नोंद झाल्या असून, त्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत.

५ वर्षात ९८७ जणांचा मृत्यू -

आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ पर्यंत ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३ हजार ६६ जण जखमी झाले आहेत. असेही आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने कळवले आहे.

Last Updated : Feb 22, 2020, 12:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details