मुंबई- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जुलै महिन्यातच शाळा सुरू करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. जोपर्यंत कोरोनाचे संकट टळत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई करू नये अन्यथा, लाखो मुलांचे, पालकांचे आणि शिक्षकांचेही आरोग्य धोक्यात येईल. त्यासाठी सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशारा दिला आहे.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये राज्यातील शाळा या टप्प्याटप्याने सुरू केल्या जाणार असून, त्यासाठीचा निर्णय आणि संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आहे. या निर्णयानुसार राज्यात जुलै महिन्यात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग शाळांमध्ये प्रत्यक्षात भरणार आहेत. तर ऑगस्ट महिन्यात सहावी ते आठवी आणि सप्टेंबर महिन्यात पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, या शाळा सुरू करण्यासाठी सरकारने नेमके काय नियोजन केलेले आहे. याबद्दलचे नियोजन स्पष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस, मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज आणि शिक्षक आमदार नागो गाणार ऑनलाईन शिक्षणात मोठ्या अडचणी असून, शाळांमध्ये शिक्षकांना बोलावले जात आहे. त्यातून कोरोनाचा धोका वाढणार असल्याने त्याचा पुर्नविचार करावा अशी मागणी घागस यांनी केली आहे. मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सकरारच्या निर्णयाला विरोध केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत पूर्ण संपत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई करू नये. शाळा सुरू होण्यासाठी उशीर झाला तर फार मोठे नुकसान होणार नाही. परंतु, उद्या काही प्रसंग उद्भवला तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल. यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सांगितले की, कोरोना संकटाची भीषणता लक्षात घेऊनच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी शाळा ऑगस्टपासून सुरू करण्याचे सांगितले आहे. आज राज्यात रोज 3 हजारांहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडत असताना शाळा सुरू करण्याची घाई करू नये. राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या जीविताचा विचार करावा अशी मागणी करत आमदार गाणार यांनी शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले असे असताना शाळा सुरू करण्याची घाई हवीच कशाला, असा सवाल गाणार यांनी केला. दरम्यान, शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील शाळा लवकर सुरू करू नये अशी मागणी केली आहे.