मुंबई -राज्यात सातत्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनाच्या महासंकटाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, अजूनही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढत वाढ होताना दिसत आहे. 2020 वर्षाअखेरीला रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली होती. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता, प्रमुख शहरामध्ये कठोर निर्बंधही लावण्यात आलेले आहेत. यासर्व परिस्थितीबाबत 'ईटीव्ही भारत'ने सायन रुग्णालयाच्या औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा बनसोडे यांच्याशी संवाद साधला.
लॉकडाऊन हटवल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ -
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता सुरुवातीच्या काळात लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे काही अंशी रुग्णसंख्येचं प्रमाण हे कमी होत होतं. मात्र, लॉकडाउन रिलीज केला तसे लोक घराच्या बाहेर पडू लागले. प्रत्येक जण हा रोजगारासाठी कामावर जाऊ लागला आणि कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. वैयक्तिक अनुभव सांगायचा झाल्यास बसमधून ट्रॅव्हल करताना अनेक लोक उभे राहून ट्रॅव्हल करत होते. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क योग्यप्रकारे नव्हता. बसमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडताना दिसला, असे सीमा बनसोडे म्हणाल्या.
हेही वाचा -चिंताजनक! राज्यात शुक्रवारी 15 हजार 817 नवे कोरोनाबाधित
स्लम परिसरात कोरोना रोखण्यात यश -
सीरो सर्वेतून आलेल्या माहितीनुसार झोपडपट्टी किंवा चाळीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, सोसायटी आणि इमारतीमध्ये हा प्रादुर्भाव वाढत आहे. याबाबत डॉ. बनसोडे म्हणाल्या, मुंबईत जितके स्लम पॉकेट आहेत तिथे महानगरपालिकेचे कमुनिटी मेडिसिन डिपार्टमेंट, मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आणि पब्लिक हेल्थ सर्विस यांच्याकडून सक्त कारवाई करण्यात आली. डोअर टू डोअर पब्लिक स्पेसिंग करण्यात आला. प्रत्येकाच्या चाचण्या करण्यात आल्या. यानंतर अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तसेच जे पॉझिटिव्ह नाहीत त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळेच झोपडपट्टी परिसरात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली.