महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला 'त्या' पलटीने तारले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, बदलत्या राजकीय परिस्थितीचे भान असल्याने त्यांना शिवसेनेसोबत युती हवी होती. मात्र, त्यांनीही युती हवी पण आम्ही लाचार नसल्याचे सांगत शिवसेना नेतृत्वाला संदेश दिला होता. तर राज्यात मिळालेले यश हे महायुतीचे असल्याचे सांगत विधानसभेलाही युती कायम ठेवणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेला राज्यातही सत्तेचा वाटेकरी होण्यास मदतच होणार आहे.

By

Published : May 24, 2019, 4:12 PM IST

लोकसभा निकाला नंतर विजयी जल्लोष करताना


मुंबई - १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. जनतेने पुन्हा एकदा राज्यासह देशात भाजपला कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. राज्यात युती, आघाडीच्या निकालाची आकडेवारी ही २०१४ च्या निकालापेक्षा वेगळी नाही. मात्र, या संपूर्ण लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पाहिल्यास सत्तेला लाथ मारून युती आणि सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेला नव संजिवनी मिळाली आहे, हेच या निकालातून स्पष्ट होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आणि देशातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेतली. वेळोवेळी सरकारच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित केले. शिवसेना सत्तेत असताना देखील विरोधी पक्षाच्या मानसिकतेत होती. दोन्ही पक्षातून पस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. शिवसेनेने तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी वातावरण निर्मितीही केली. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर पंढरपुरच्या सभेत बोलताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे करत युती गेली खड्ड्यात, असा निर्वाणीचा इशारा दिला होता.

पहिले मंदिर फिर सरकार म्हणत या लोकसभा निवडणुकीत युतीला फाटा देण्याचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे दिल्लीतल्या भाजप नेत्यांचाही शिवसेनेबाबतचा सूर अजून कडक झाला. शिवसेनेच्या स्वबळाच्या भाषेनंतर भाजपनेही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना स्वबळासाठी सज्ज राहण्याच्या सुचना केल्या. लातुरातील सभेत बोलताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी 'युती झाली तर ठीक नाहीतर शिवसेनेला ही लोळवू (पटक देंगे) असा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसैनिकही चांगलेच खवळले होते. एवढेच काय तर उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा उल्लेख कुंभकर्ण, अफझल खान, अशा शद्बांत केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही? याबाबत साशंकता होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, बदलत्या राजकीय परिस्थितीचे भान असल्याने त्यांना शिवसेनेसोबत युती हवी होती. मात्र, त्यांनीही युती हवी पण आम्ही लाचार नसल्याचे सांगत शिवसेना नेतृत्वाला संदेश दिला.

लोकसभा निवडणुकीपूर्वीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता पुढील काळात सेना-भाजपला एकत्र लढणेच तारणार होते. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून पुन्हा एकदा युतीची बोलणी सुरू झाली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या मातोश्रीवर बैठकाही झाल्या. अखेर शिवसेना-भाजपमधील तुतु-मै-मै ला पूर्णविराम मिळाला आणि हिंदूत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा युती झाली.

सत्तेला लाथ मारण्याची आणि युतीला खडड्यात घालणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्त्वाने अखेरच्यावेळी कोलांटी उडी मारली आणि भाजपसोबत दिलजमाई केली. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीचीही घोषणा केली आणि हिच युती आज सेनेच्या फायद्याची ठरली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेवून हिंदूत्वाच्या मुद्द्यावर सेनेने ऐनवेळी घेतलेला युतीचा निर्णय त्यांच्या चांगलाच पथ्थ्यावर पडला आहे. या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. युतीत असताना देखील त्यांना हा पराभव पाहावा लागला. मात्र, स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने युती केली नसती तर कोल्हापूर, हातकंणगले, उस्मानाबाद, या ठिकाणचे यश त्यांना कदाचित मिळाले नसते. तसेच भाजपच्या प्रचारयंत्रणेचा आणि मोदी लाटेचा फायदा सेनेला मिळवता आला, हेच या निकालातून स्पष्ट होते.

राज्यात मिळालेले यश हे महायुतीचे असल्याचे सांगत विधानसभेलाही युती कायम ठेवणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेला राज्यातही सत्तेचा वाटेकरी होण्यास मतदतच होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details