महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी प्रचाराचे 'ते' कार्ड बनवणाऱ्या कंपनीचे थेट भाजपशी संबंध - सचिन सावंत

मंगळवारी खार येथे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धाड टाकून मोदींच्या प्रचारासाठी तयार करण्यात येत असलेले शेकडो कार्ड ताब्यात घेतली. त्यानंतर युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीला सील ठोकले. यावर तोंडघशी पडलेल्या भाजपकडून या कंपनीशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला होता. त्यावर आज सचिन सावंत यांनी या कंपनीशी असलेले भाजपचे थेट लागेबांधे उघड केले.

By

Published : Apr 10, 2019, 11:04 PM IST

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत

मुंबई - सर्जिकल स्ट्राइकचा वापर प्रचारासाठी करून त्यासाठी लाखो कार्ड बनवणाऱ्या कंपनीचे लागेबांधे थेट भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांशी आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल यांची युनायटेड फॉस्फरस लिमिटेड ही कंपनी असून याच कंपनीत मोदी यांचा आवाज असलेले आणि सर्जिकल स्ट्राइकच्या नावाने मते मागणारे कार्ड बनवली जात होती. त्यामुळे या कंपनीशी भाजपाशी थेट लागेबांधे असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत
मंगळवारी खार येथे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धाड टाकून मोदींच्या प्रचारासाठी तयार करण्यात येत असलेले शेकडो कार्ड ताब्यात घेतली. त्यानंतर युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीला सील ठोकले. यावर तोंडघशी पडलेल्या भाजपकडून या कंपनीशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला होता. त्यावर आज सचिन सावंत यांनी या कंपनीशी असलेले भाजपचे थेट लागेबांधे उघड केले. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांची ही कंपनी आहे. त्यांचे अनेक व्यवहार आणि त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या अनेक बाबी उघडकीस आणल्या.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि राहुल शेवाळे यांनी देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडच्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या कंत्राटावर एकमेकांवर आरोप केले होते. एवढे मोठे कंत्राट पियुष गोयल यांच्या बंधूच्या याच कंपनीला देण्यात आले होते. त्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. ही बाबसुद्धा सावंत यांनी यावेळी सांगितली.

भाजपचे लागेबांधे असलेल्या कंपनीनेच विषारी कीटकनाशके तयार करून यवतमाळमधील शेतकऱ्यांचा जीव घेतला. त्यावरही सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. याच कंपनीने विषारी कीटकनाशके तयार केल्यामुळे यवतमाळमधील शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही या कंपनीचे संचालक असलेल्या गोयल यांच्यावर भाजपने कोणती कारवाई केली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सचिन सावंत यांनी यावेळी केली.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडून अशाप्रकारे प्रचारासाठी खालच्या स्तरावर जाऊन सैनिकांच्या कर्तृत्त्वाचे श्रेय घेतले जात आहे. सर्जिकल स्ट्राइकच्या नावाखाली मते मागितली जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. भाजपने आपल्या प्रचारासाठी कितीही आकांडतांडव केली. संविधानिक मूल्य पायदळी तुडवली, तरीही आता त्यांचा पराजय देशातील जनता करणार आहे. त्यांचे सर्व पितळ देशापुढे उघडे पडले असून राफेल प्रकरणातसुद्धा न्यायालयाने दिलेला निकाल ही मोदींसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार आल्यास मोदी हे जेलमध्ये पाहायला मिळतील, असा दावाही सावंत यांनी यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details