महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 26, 2019, 1:23 PM IST

Updated : Sep 26, 2019, 3:50 PM IST

ETV Bharat / state

अस्तित्वाची लढाई! विधानसभेच्या निवडणुकीत 'डावे' ठरणार का 'उजवे'?

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता चालू झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच सध्या डाव्या पक्षांची भूमिका काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणुकीत डाव्यांची भूमिका काय

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोणता पक्ष किती जागा लढवणार, कुठून लढणार याची चर्चा माध्यमातून होत आहे. पण, या सर्व गदारोळात भारतातील जुन्या पक्षांपैकी असणारे डावे पक्ष कुठे आहेत याची कुठे वाच्यता होताना दिसत नाही. आंदोलनाच्या मैदानात डाव्यांचा उल्लेख नेहमी होतो. पण, निवडणुकीच्या रणात मराठी माध्यमे डाव्यांना गृहीत धरताना दिसत नाहीत. त्यामुळे, विधानसभेच्या या निवडणुकीत डावे काय करत आहेत, याची माहिती ईटीव्ही भारत आपल्या वाचकांसाठी देत आहे.

1978 ला डाव्यांचे 13 आमदार-
महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे प्रमुख डावे पक्ष आहेत. लाल निशाण, फॉरवर्ड ब्लॉक, जनता दल (सेक्युलर) या डाव्या पक्षांनी राज्यातील आपला जनाधार काही वर्षांपासून गमावला आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले आहेत. १९७८ साली डाव्या पक्षांचे (शेकाप वगळून) महाराष्ट्र विधानसभेत एकूण १३ आमदार होते. पण, गेल्या अनेक वर्षांपासून डावे पक्ष दोन आकडी संख्या गाठू शकले नाहीत.

प्राबल्य असलेल्या ठिकाणाहून डावे रिंगणात-
२०१९ ची निवडणूक डावे पक्ष डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली लढत आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष १५ तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १४ जागा लढणार आहे. शेतकरी कामगार पक्ष आपल्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायगड आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातून लढणार आहेत. डावी आघाडी म्हणून विधानसभा लढवायची हे जवळपास निश्चित असले, तरी काँग्रेस आघाडीसोबतही या पक्षांची बोलणी सुरू असल्याचे समजते. आमचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी काँग्रेस आघाडीने उमेदवार देऊ नयेत, याबद्दल डाव्या आघाडीचे नेते आग्रही आहेत. या आग्रहाला काँग्रेस आघाडीचे नेते काय प्रतिसाद देतात ते काही दिवसातच स्पष्ट होईल.

हे मतदारसंघ आहेत डाव्यांचे गड
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काही पारंपरिक प्रभाव क्षेत्र आहेत. यात ठाणे, पालघर, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, मराठवाड्याच्या काही भागांचा समावेश होतो. यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात जनसंघटनांच्या माध्यमातून माकप आपले अस्तित्व टिकवून आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण - सुरगणा मतदारसंघातून माकपचे एकमेव आमदार जे. पी. गावीत निवडून आले आहेत. यावेळी १४ मतदारसंघातून माकप निवडणूक लढवत आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जनाधार काही वर्षांपासून कमी होत गेला आहे. पण, जनसंघटनांच्या माध्यमातून भाकप जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरताना दिसतो. निवडणुकीच्या रणांगणातही भाकप चाचपणी करतो, पण मतदारांचा कौल मिळवण्यात पक्षाला अपयश येत आहे. डाव्या आघाडीत भाकप १५ जागा लढवत आहे.

शेतकरी कामगार पक्ष कधी काळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांपैकी होता. ग्रामीण भागात त्यांची चांगली पकड होती. याच जोरावर कधी काळी शेकापचे २८ आमदार निवडून आले होते. आज शेकापचे विधानसभेत तीन आमदार आहेत. शेकाप केवळ रायगड जिल्ह्यापुरता मर्यादीत उरला आहे. अपवाद फक्त सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचा. तिथून भाई गणपतराव देशमुख ५० वर्षांपासून शेकापचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यावेळी देखील याच ठिकाणाहून शेकाप उमेदवार उतरवत आहे.

डाव्यांची जनतेपासून फारकत ?
जन आंदोलन हा डाव्या राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या जन्मापासून म्हणजे १९२५ पासून डावे श्रमिक वर्गाला संघटीत करत आहेत. राजकारण, समाजकारण, साहित्य, सिनेमा या सर्व क्षेत्रांवर डाव्यांनी आपला प्रदीर्घ ठसा उमटवला. सत्तेत नसतानाही डाव्यांच्या राजकारणाने सत्ताधाऱ्यांना अनेकदा झुकायला लावले हा इतिहास आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातही डाव्यांनी महत्वाची भूमिका बजावली. विद्यार्थी, कामगार, शेतकरी चळवळी असतील की संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, डावे केंद्रस्थानी राहिले. श्रीपाद अमृत डांगे, बी.टी. रणदिवे, क्रांतीसिंह नाना पाटील, गोदावरी परुळेकर, अहल्या रांगणेकर, शामराव परुळेकर, डी.जी. लाड, नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्यासारखे दिग्गज नेते डाव्या पक्षांनी महाराष्ट्राला दिले. पण, हा इतिहास झाला. आज डावे काही भागापुरते मर्यादित होऊन बसले आहेत. राज्याच्या राजकारणात म्हणावा तितका प्रभाव पाडण्यात अनेक वर्षांपासून त्यांना अपयश येत आहे. जनतेच्या मनात ते एखाद्या दंतकथेसारखे जिवंत आहेत. नव्या पिढीतील बहुसंख्यांना डाव्यांच्या राजकारणाचा परिचय नाही. त्यातील काही जण डावे राजकारण नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित डाव्यांसाठी यातच कुठेतरी आशा दडली आहे. अमुक पक्षासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे असे म्हटले जाते. डावे त्यांचे अस्तित्व निवडणुकीतून मोजत नाहीत. आंदोलनांना ते आपली शक्ती मानतात. तरीही जनतेचा कौल तपासण्यासाठी ते निवडणुकीत उतरले आहेत. जनता त्यांना काय कौल देते हे काही दिवसात स्पष्ट होईलच.

Last Updated : Sep 26, 2019, 3:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details