मुंबई -विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे, हेच या निकालाने सिद्ध होते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी हा विजय महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना समर्पित केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते? हेही या निकालाने दाखवून दिले असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्रपक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन करतानाच महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया -
भाजपचा जो उन्माद होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला. हे फक्त सरकारचं लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉझिटसुद्धा राहणार नाही, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
हेही वाचा -संविधानासोबतच बाबासाहेबांचे देश उभारणीत मोठे योगदान - शरद पवार