मुंबई - पहिल्या लोकसभेपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आघाडीने एकही जागा दिली नाही. यामुळे या पक्षाचे अस्तित्व लोकसभेत उरणार नाही. तसेच, रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ही या निवडणुकीत नसल्याने राज्यातल्या छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आतापर्यंत या पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत हे पक्ष रिंगणातून हद्दपार झाले आहेत.
या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका या छोट्या पक्षांना बसला आहे. भाजप आणि शिवसेना युतीने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन युतीला तर महाघाडीने अन्य रिपब्लिकन पक्षांना संधी दिली नाही. तसेच, शेतकरी कामगार पक्ष आघाडीत सामील होऊनही त्यांना एकही जागा देण्यात आलेली नाही.
लोकसभेतील या छोट्या राजकीय पक्षांचा आलेख
शेतकरी कामगार पक्ष
- शेकाप १९५२ पासून निवडणूक लढवत आहे. मात्र, कालांतराने पक्षाला उतरती कळा लागली. राज्यात रायगड आणि सोलापुरातील सांगोला विधानसभा मतदार संघात पक्षाला जनाधार आहे. मागील निवडणुकीत रायगड आणि सिंधुदुर्ग मतदार संघात निवडणूक लढवली होती. एकेकाळी शेकापने कुलाबा मतदार संघातून राजाराम राऊत, दिनकर पाटील आणि रामशेठ ठाकूर यांना संसदेत पाठवले होते.