मुंबई- महाराष्ट्रात लस उपलब्ध नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. या परिस्थितीसाठी सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार असल्याची टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. केंद्र सरकारचे लसीकरणाबाबत नियोजन शून्य होते. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणाचे नियोजन बिघडले असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच नियोजन करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याला कोरोनामुक्त करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न
प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट तयार करण्यासंदर्भातचे निर्देश दिले गेले असून, त्यासाठी टेंडर मागवण्याचे काम सुरू असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. हवेतून ऑक्सिजन तयार करणारे प्लांट प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात असले पाहिजेत. तसेच ऑक्सीजन साठवून ठेवण्याच्या क्षमतेचे टँकची देखील व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यासंदर्भातचे निर्देश दिले असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस आयात करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या सोबतच राज्यात लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून राज्याला करोना मुक्त करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.