मुंबई -राज्यात 2020 या वर्षात अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. काही गुन्ह्यांमुळे राज्यातच नाही तर देशातही खळबळ उडाली. वर्षभरात गुन्हेगारी जगतात घडलेल्या घडमोडींचा एक आढावा.
वर्धा जळीतकांड : आरोपीने प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जीवंत जाळले
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेत आरोपीने एका तरूणीला भर रस्त्यात जिवंत जाळले. 3 फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने पिडीता हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि तिला जाळले. त्यात ही तरुणी 40 टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात आंदोलने आणि आक्रोश झाला होता.
पालघर मॉब लिंचींग, चोर समजून साधूला गावकऱ्यांनी केले ठार
पालघरमध्ये लॉकडाऊन दरम्यान मॉब लिंचींगमध्ये तीन जणांची चोर समजून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. 16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे ही घटना घडली. चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात 165 आरोपींना अटक करण्यात आली. यातील 11 जण अल्पवयीन होते. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची अन्य जिल्ह्यात ठिकाणी बदली करण्यात आली.
नातेवाईकानेच केली बहिण-भावाची हत्या
औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. 9 जूनला रात्री ही घटना उघडकीस आली होती. किरण लालचंद राजपूत (वय 19 वर्षे) आणि सौरभ लालचंद राजपूत (वय 17 वर्षे), अशी मृतांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह घरातील बाथरूममध्ये आढळून आले होते. दोघांचाही गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती. दीड किलो सोनं आणि साडेसहा हजारांची रोकड घेऊन आरोपींनी पोबारा केला होता. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी हे हत्याकांड नातेवाईकानेच घडवून आणले होते.
पतीसह दोन चिमुकल्यांना विषारी इंजेक्शन देत डॉक्टर पत्नीची आत्महत्या
18 ऑगस्ट, 2020 ला नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओमनगरमधील एका दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, पोसीस तपासात जे समोर आले त्याने संपूर्ण राज्य चक्रावून गेले. डॉ. सुषमा राणे यांनी त्यांचे पती धीरज राणे आणि दोन चिमुकल्यांना विषारी इंजेक्शन दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. धीरज राणे, सुषमा राणे आणि त्यांची मुले ध्रुव व वण्या यांचे मृतदेह ज्या ठिकाणी आढळले होते. त्या घटनास्थळावर आढळून आलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवल्या होत्या. पोलिसांना मृतांचे शवविच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले. ज्यामध्ये डॉ. सुषमा राणे यांच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्याचे होते तर, धिरज, ध्रुव आणि वण्या राणे यांच्या मृत्यूचे कारण विषारी औषध होते. राणे कुटुंबीयांच्या सामुहिक आत्महत्ये मागे आर्थिक कारण असल्याचे सुरुवातीच्या तपासात पुढे आले होते. मात्र, आता पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. डॉ. सुषमा आणि धीरज यांची आर्थिक स्थिती भक्कम होती. महिन्याकाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त मिळकत त्यांच्या घरात येत होती. घर आणि वाहनांच्या कर्जाचे हप्तेही ते अगदी नियमितपणे भरत होते. मात्र, दोघांमध्ये वैयक्तीक पातळीवर वादावादी सुरू होती. धीरज हा सुषमा यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्याने सुषमा यांचे कॉल देखील आपल्या मोबाईलवर वळते केले होते. धीरज हा दारूच्या आहारी गेल्याने त्यांच्यात रोजच भांडण व्हायची. शिवाय त्याचे बाहेर संबंध असल्याने देखील राणे दाम्पत्यामध्ये संबंध ताणले गेले होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळेच डॉ. सुषमा राणे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
गृहमंत्र्यांच्या घराजवळच झाली 'फिल्मी स्टाईल'ने हत्या
कुख्यात गुन्हेगार किशोर उर्फ बाल्या बिनेकरचा खून झाल्याची खळबळजनक घटना 26 सप्टेंबर, 2020ला घडली होती. फिल्मी स्टाईलने बाल्या बिनेकर असलेल्या कारचा दुचाकीने पाठलाग करत सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोले पेट्रोलपंप चौकात हल्लेखोरांनी बाल्याची हत्या केली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्स परिसरातील घरापासून केवळ एक किमी अंतरावर ही घटना घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 24 तासांच्या आत मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी ही हत्या करण्यात आली होती, अशी कबुली आरोपींनी दिली.