महाराष्ट्र

maharashtra

मागोवा 2020 : विविध हत्याकांड अन् गुन्ह्यांमुळे हादरला महाराष्ट्र

By

Published : Dec 25, 2020, 6:31 AM IST

Updated : Dec 26, 2020, 5:03 PM IST

मुंबई - राज्यात 2020 या वर्षात अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. काही गुन्ह्यांमुळे राज्यातच नाही तर देशातही खळबळ उडाली. वर्षभरात गुन्हेगारी जगतात घडलेल्या घडमोडींचा एक आढावा.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई -राज्यात 2020 या वर्षात अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. काही गुन्ह्यांमुळे राज्यातच नाही तर देशातही खळबळ उडाली. वर्षभरात गुन्हेगारी जगतात घडलेल्या घडमोडींचा एक आढावा.

वर्धा जळीतकांड : आरोपीने प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जीवंत जाळले

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेत आरोपीने एका तरूणीला भर रस्त्यात जिवंत जाळले. 3 फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने पिडीता हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि तिला जाळले. त्यात ही तरुणी 40 टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात आंदोलने आणि आक्रोश झाला होता.

हिंगणघाट प्रकरणातील आरोपी व घटनास्थळ

पालघर मॉब लिंचींग, चोर समजून साधूला गावकऱ्यांनी केले ठार

पालघरमध्ये लॉकडाऊन दरम्यान मॉब लिंचींगमध्ये तीन जणांची चोर समजून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. 16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे ही घटना घडली. चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात 165 आरोपींना अटक करण्यात आली. यातील 11 जण अल्पवयीन होते. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची अन्य जिल्ह्यात ठिकाणी बदली करण्यात आली.

मॉब लिचिंगमधील मृत साधू व घटनास्थळ

नातेवाईकानेच केली बहिण-भावाची हत्या

औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. 9 जूनला रात्री ही घटना उघडकीस आली होती. किरण लालचंद राजपूत (वय 19 वर्षे) आणि सौरभ लालचंद राजपूत (वय 17 वर्षे), अशी मृतांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह घरातील बाथरूममध्ये आढळून आले होते. दोघांचाही गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती. दीड किलो सोनं आणि साडेसहा हजारांची रोकड घेऊन आरोपींनी पोबारा केला होता. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी हे हत्याकांड नातेवाईकानेच घडवून आणले होते.

राजपूत यांचे घर व प्रातिनिधीक छायाचित्र

पतीसह दोन चिमुकल्यांना विषारी इंजेक्शन देत डॉक्टर पत्नीची आत्महत्या

18 ऑगस्ट, 2020 ला नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओमनगरमधील एका दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, पोसीस तपासात जे समोर आले त्याने संपूर्ण राज्य चक्रावून गेले. डॉ. सुषमा राणे यांनी त्यांचे पती धीरज राणे आणि दोन चिमुकल्यांना विषारी इंजेक्शन दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. धीरज राणे, सुषमा राणे आणि त्यांची मुले ध्रुव व वण्या यांचे मृतदेह ज्या ठिकाणी आढळले होते. त्या घटनास्थळावर आढळून आलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवल्या होत्या. पोलिसांना मृतांचे शवविच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले. ज्यामध्ये डॉ. सुषमा राणे यांच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्याचे होते तर, धिरज, ध्रुव आणि वण्या राणे यांच्या मृत्यूचे कारण विषारी औषध होते. राणे कुटुंबीयांच्या सामुहिक आत्महत्ये मागे आर्थिक कारण असल्याचे सुरुवातीच्या तपासात पुढे आले होते. मात्र, आता पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. डॉ. सुषमा आणि धीरज यांची आर्थिक स्थिती भक्कम होती. महिन्याकाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त मिळकत त्यांच्या घरात येत होती. घर आणि वाहनांच्या कर्जाचे हप्तेही ते अगदी नियमितपणे भरत होते. मात्र, दोघांमध्ये वैयक्तीक पातळीवर वादावादी सुरू होती. धीरज हा सुषमा यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्याने सुषमा यांचे कॉल देखील आपल्या मोबाईलवर वळते केले होते. धीरज हा दारूच्या आहारी गेल्याने त्यांच्यात रोजच भांडण व्हायची. शिवाय त्याचे बाहेर संबंध असल्याने देखील राणे दाम्पत्यामध्ये संबंध ताणले गेले होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळेच डॉ. सुषमा राणे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

राणे कुटुंबिय

गृहमंत्र्यांच्या घराजवळच झाली 'फिल्मी स्टाईल'ने हत्या

कुख्यात गुन्हेगार किशोर उर्फ बाल्या बिनेकरचा खून झाल्याची खळबळजनक घटना 26 सप्टेंबर, 2020ला घडली होती. फिल्मी स्टाईलने बाल्या बिनेकर असलेल्या कारचा दुचाकीने पाठलाग करत सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोले पेट्रोलपंप चौकात हल्लेखोरांनी बाल्याची हत्या केली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्स परिसरातील घरापासून केवळ एक किमी अंतरावर ही घटना घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 24 तासांच्या आत मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी ही हत्या करण्यात आली होती, अशी कबुली आरोपींनी दिली.

किशोर उर्फ बाल्या बिनेकरची वाहन

बोरखेडा हत्याकांडाने राज्य हादरले, चार भावंडांचा कुऱ्हाडीने खून

जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा येथे शेतातील घरात चार भावंडांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. या चारीही भावंडांचे कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले होते. शिवाय या चार भावंडातील मोठ्या बहिणीवर अत्याचार झाल्याचेही स्पष्ट झाले होते. मृतांमध्ये सर्वजण अल्पवयीन होते. सर्वात छोटी मुलगीही तीन वर्षांची होती. मृत भावंडांचे आई-वडील हे आपल्या मोठ्या मुलासह नातेवाईकांकडे गेले होते. याच दरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र सीताराम बारेला (वय 19 वर्षे, रा. केऱ्हाळा, ता रावेर), यास अटक केली. संशयित आरोपींमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलीस अधिक माहिती देत नसून तपास सुरू आहे.

बोरखेडा येथील घटनास्थळ

पुण्यात महिलेचा विनयभंग करुन दोन्ही डोळे केले निकामी

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे शौचास गेलल्या महिलेचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना 9 नोव्हेंबर 2020 ला आली होती. त्यात त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला करत तिचे केस पकडून खाली पाडले. त्यानंतर त्याने धारदार हत्याराने एक डोळा बाहेर काढला, तर दुसरा डोळाही निकामी केला. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिचा पती व शेजारील नागरिक मदतीसाठी धावत आले. काही दिवसांनी हल्लेखोर कुंडलीक बगाडे याला पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना इतकी क्रूर होती की त्याचे पडसाद सभोवतालच्या परिसरात उमटले. या हल्ल्यात महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले.

न्हावरे गावातील छायाचित्र

ठाण्यात मनसेच्या स्थानिक नेत्याची भर दिवसा हत्या

ठाण्यात मनसेच्या स्थानिक नेत्याची 23 नोव्हेंबरला भर दिवसा डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. जमील शेख असे त्यांचे नाव होते. ते राबोडीचे प्रभाग प्रमुख होते. या प्रकरणी शाहिद शेख या आरोपीला अटक करण्यात आली होती. ठाण्यात दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

संग्रहीत छायाचित्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा जातेगाव घाटात खून

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा 1 डिसेंबरला खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. पुण्याहून कुटुंबासह नगरकडे परतत असताना जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्ला झाला. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमागे अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार असल्याचेही समोर आले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे

नागपुरात आजी आणि नातवाचा राहत्या घरी खून; प्रेम प्रकरणातून हत्या

नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजी आणि नातवाच्या दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना घडली 10 डिसेंबरला घडली होती. हजारीपहाड भागातील कृष्णानगरमध्ये ही घटना घडली होती. यात लक्ष्मीबाई धुर्वे (वय 60 वर्षे, आजी) आणि यश धुर्वे (वय 10 वर्षे, नातू) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडले होते. पोलीस मागावर असल्याने आरोपीने नंतर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

आजी व नातू

बॉलिवूड आणि ड्रग्ज रॅकेट

बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शनमुळे संपूर्ण देशात एकच भूकंप झाला. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा शोध एनसीबी घेत आहे. यात मोठे खुलासे समोर आले. या प्रकणी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, नकुलप्रित सिंग, अर्जुन रामपाल, भारती सिंग, करण जोहर यांच्या सारखे दिग्गज चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. तर सध्या अर्जुन रामपालची चौकशी सुरू आहे.

एनसीबी
Last Updated : Dec 26, 2020, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details