महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MUMBAI RAIN UPDATE :मुंबईत पावसाचे ३ बळी तर ५ जण जखमी, येत्या ४८ तासांत धुवाँधार

गेले चार महिने उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना बुधवारी रात्री पासून पडत असलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केल्याने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे.

By

Published : Jun 28, 2019, 4:45 PM IST

Updated : Jun 28, 2019, 7:48 PM IST

पावसाने केली जोरदार बॅटिंग

मुंबई- गेले चार महिने उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना बुधवारी रात्री पासून पडत असलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. ठाण्याच्या मखमली तलाव, मुंबईत सायन, हिंदमाता, अंधेरी, कुर्ला आदी सखल विभागात पाणी साचल्याने बेस्टचे बस मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनही उशिराने धावत असल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यास उशीर लागत आहे.

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

MUMBAI RAIN UPDATE :

  • दादर येथे पावसामुळे भिंत कोसळली.
  • गोरेगाव आणि अंधेरी येथे शॉक लागून ३ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी.
  • शहरात माझगाव चाळ नंबर ५१ A, ताडदेव बीएमसी गॅरेज, पूर्व उपनगरमध्ये सायन सोनापूर गल्ली, शितल टॉकीज, साकिनाका, घाटकोपर पश्चिम बर्वे नगर, पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज बांद्रा, अंधेरी मेट्रो स्टेशन, मिलन सबवे, अंधेरी सब वे आदी ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी.
  • पाण्याचा निचरा करण्यासाठी ६१ पंपाचा वापर.
  • सकाळी ८ वाजल्यापासून ११ पर्यंत पूर्व उपनगरात ६४.१४ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ७८.२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
  • मुंबईत पाणी साचल्याने बस मार्गात बदल.
  • येत्या ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
  • दादर येथील सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान येथे संरक्षक भिंत कोसळून तीन जण जखमी झाले.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची प्रतीक्षा असते. मात्र, जून संपता संपता पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाने मुंबईला झोडपून काढल्याने हिंदमाता, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, सायन, वडाळा, अंधेरी सब वे, मिलन सबवे, बोरिवली, मानखुर्द, परळ, दादर आदी सखल भागात पाणी साचले होते. सखल भागात पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक वळवण्यात आली.

अंधेरी सबवेत कंबरेपर्यंत पाणी साचल्याने येथील वाहतुकीचा खोळंबा झाला. येथील मोगरा नाला तुंबल्याने परिसरात पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आणि परिसरात पाणीच पाणी साचले होते. चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग, शेल कॉलनी येथे रस्त्यावर पाणी तुंबले होते. पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. भांडुप, कांजूरमार्ग येथील रेल्वे ट्रकमध्ये पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात नियोजित वेळेत पोहचण्यास उशिर झाला.

मुंबईत काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. तर सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासात पडलेल्या पावसात शहर विभागापेक्षा पूर्व आणि पश्चिम उपनगरात जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात (काल रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत) शहरात ३.५० मिलिमीटर, पूर्व उपनगरात १८.२३ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात १०.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सकाळी ८ वाजल्यापासून ११ पर्यंत पूर्व उपनगरात ६४.१४ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ७८.२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून वरळी अग्निशमन केंद्र येथे २७, पूर्व उपनगरात चेंबूर अग्निशमन केंद्र येथे २५ तर पश्चिम उपनगरात गोरेगांव येथे ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या ठिकाणी साचले पाणी -

शहरात माझगाव चाळ नंबर ५१ A, ताडदेव बीएमसी गॅरेज, पूर्व उपनगरमध्ये सायन सोनापूर गल्ली, शितल टॉकीज, साकिनाका, घाटकोपर पश्चिम बर्वे नगर, पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज बांद्रा, अंधेरी मेट्रो स्टेशन, मिलन सबवे, अंधेरी सब वे आदी ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे नोंद झाल्या आहेत.

साचलेले पाणी काढण्यासाठी ६१ पंपाचा वापर -

मुंबईत पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ६१ पंपाचा वापर करण्यात आला. शहरात १०, पूर्व उपनगरात ३० तर पश्चिम उपनगरात २१ पंप सुरू करून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा लागला.

मुंबईत पाणी साचल्याने बस मार्गात बदल -

ठाण्याच्या मखमली तलाव येथे पाणी साचल्याने ४९४ व ४९९ हे दोन मार्ग वंदना टॉकीज येथून फिरवण्यात आले. मुंबईत सायन रोड क्रमांक २४ येथे पाणी साचल्याने २५,२२,३०२,३०५ आणि २१३ हे मार्ग मुख्य रस्त्याने वळवण्यात आले. हिंदमाता येथे पाणी साचल्याने बस क्रमांक १,४,५,६,७,८,११,२१ हे मार्ग हिंदमाता पुलावरून तसेच शिवडीला जाणाऱ्या बस मार्ग २१२, २१३, ४० हे शारदा टॉकीज व दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथून वळवण्यात आल्या. येत्या ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू -

दिवसभरात विजेच्या धक्क्याने 5 पैकी 3 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पश्चिम उपनगरात अंधेरी पश्चिम येथे सकाळी पावणे आठच्या सुमारास आण्णा नगर, आरटीओ कार्यालय समोर विजेच्या धक्क्याने काशिमा युडीयार (६०) या महिलेचा मृत्यू झाला. तर गोरेगाव पूर्व येथील दुर्गामाता मंदिराच्या मागे चार जणांना विजेचा धक्का लागला. यातील राजेंद्र यादव (६०), संजय यादव (२४) या दोघांचा मृत्यू झाला तर आशादेवी यादव (५) व दिपू यादव (२४) हे दोघे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शॉक लागल्यावर एकमेकांना वाचवताना यादव कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

भिंत कोसळून तीन जण जखमी -

दादर येथील सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान येथे संरक्षक भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. चंद्रकांत तोडवले (३५), विजय नागर (३५) व चेतन ताठे (२८) अशी जखमींची नावे आहेत.

Last Updated : Jun 28, 2019, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details