मुंबई :म्हादई नदीवरुन महाराष्ट्र, कर्नाटक, आणि गोवा या तीन राज्यात वाद सुरू आहे. कर्नाटकात उगम पावणारी म्हादई नदीचा समुद्रापर्यंतचा 111 किलोमीटरचा प्रवास करत ही नदी महाराष्ट्र ,गोवा या राज्यातून समुद्राला भेटते. या नदीच्या पाण्यासाठी तीन राज्यांचा लढा सुरू आहे. या वादावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. गोवा आणि महाराष्ट्र हे दोघे भाऊ-भाऊ आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच म्हादई नदीच्या पाण्यासाठीचा लढा हा तीन राज्यांचा प्रश्न आहे आणि हा लढा महाराष्ट्र आणि गोवा एकत्रित लढतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एका दशकाच्या कालखंडानंतर बैठक :महाराष्ट्रातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक सुमारे एका दशकाच्या कालखंडानंतर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. म्हादई नदीच्या पाण्यासाठीचा लढा हा तीन राज्यांचा प्रश्न आहे आणि हा लढा महाराष्ट्र आणि गोवा एकत्रित लढतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
गोवा आणि महाराष्ट्र एकत्रित : शिंदे म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्राचे नाते भावांसारखे आहे. म्हादईच्या पाण्यासाठीचा लढा कर्नाटकविरोधात गोवा आणि महाराष्ट्र एकत्रित मिळून लढतील. तिलारी धरण हे महाराष्ट्रात आहे. या तिलारी कालव्यातून गोव्याला पाणी पुरवठा होतो. बार्देश, पेडणे आणि डिचोली तालुक्यातील काही भागात हा पाणीपुरवठा केला जातो. म्हदई नदीचा 78 टक्के भाग कर्नाटकात असून कर्नाटक त्यावर धरण बांधत आहे. याला गोवा आणि महाराष्ट्राने विरोध दर्शवला आहे.