महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फायर रोबो 'फेल'- अग्निशमन दलाच्या प्रमुखांची चौकशी करा, भाजप नगरसेवकाची मागणी

अग्निशमन दलाच्या एका प्रस्तावावर बोलताना भाजपाचे नगरसेवक अभिजित सामंत म्हणाले, अग्निशमन दलाचे जवान जखमी होऊ नयेत, त्यांचा जीव जाऊ नये म्हणून रोबो मागवण्यात आला. मात्र हा रोबो फेल ठरला आहे. आगीवर नियंत्रण मिळवताना रोबो काम का करू शकला नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सामंत यांनी केली. एमटीएनएल इमारतीचे फायर ऑडिट केले असले तरी त्या इमारतीमध्ये खिडक्या छोट्या आहेत, आग लागल्यावर बाहेर पडण्यासाठी छोटे जिने होते. त्याबाबत अग्निशमन दलाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला आहे.

By

Published : Jul 25, 2019, 4:11 AM IST

अग्निशमन दलाचा फायर रोबो आणि दलाच्या प्रमुखांच्या चौकशीची मागणी

मुंबई - शहरातील चिंचोळ्या गल्ल्या, बेसमेंटची आग, आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ, अशा ठिकाणी थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकेल, असे सांगत मुंबई अग्निशमन दलात फायर रोबो आणण्यात आला. त्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेली आग विझवताना हा रोबो 'फेल' ठरला आहे. याचे पडसाद पालिकेच्या स्थायी समितीत उमटले. यामुळे फायर रोबो खरेदीची तसेच अग्निशमन दलाच्या प्रमुखांची चौकशी करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली आहे.

अग्निशमन दलाच्या एका प्रस्तावावर बोलताना भाजपाचे नगरसेवक अभिजित सामंत म्हणाले, अग्निशमन दलाचे जवान जखमी होऊ नयेत, त्यांचा जीव जाऊ नये म्हणून रोबो मागवण्यात आला. मात्र हा रोबो फेल ठरला आहे. आगीवर नियंत्रण मिळवताना रोबो काम का करू शकला नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सामंत यांनी केली. एमटीएनएल इमारतीचे फायर ऑडिट केले असले तरी त्या इमारतीमध्ये खिडक्या छोट्या आहेत, आग लागल्यावर बाहेर पडण्यासाठी छोटे जिने होते. त्याबाबत अग्निशमन दलाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांनी लाच लुचपत विभागाला पत्र लिहून पालिकेतील भ्रष्टाचार मिटवायचा असल्याचे म्हटले आहे. पालिकेतील भ्रष्टाचार मिटवायचा असल्यास त्याची सुरुवात अग्निशमन दल व त्याच्या प्रमुखापासून करावी अशी मागणी सामंत यांनी केली आहे.

समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी अंधेरी येथील प्रतिष्ठित असलेल्या केम्ब्रिज शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही म्हणून अग्निशमन दलाकडून त्या शाळेला त्रास दिला जात असल्याचे सांगितले. अग्निशमन दलाने एक कोटी रुपये खर्च करून एक खेळणे आणले असल्याची टीका त्यांनी केली.

मुंबईकरांच्या करामधून हा रोबो आणला असल्याने त्याच्या खरेदीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेख यांनी केली. तर रोबोला अग्निशमन दलाच्या जवानांना धक्के मारून पुढे ढकलावे लागले आहे. यावरून हा रोबो फेल ठरला आहे. या रोबो खरेदीची चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

प्रशासनाचा अजब खुलासा -
रोबोच्या चाचण्या झाल्या आहेत. वांद्रे येथील एमटीएनल इमारतीला आग लागली त्यावेळी आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पाईप पाण्याने भरल्याने ते गोलाकार झाले होते. इमारतीमध्ये आग विझवण्यासाठी जे पाणी मारले ते मोठ्या प्रवाहाने खाली येत होते. तसेच त्या इमारतीचे जिने खूपच छोटे होते. त्यामुळे रोबोला काम करण्यास अडचणी आल्याचा खुलासा मुंबई अग्निशमन दलाकडून स्थायी समितीत करण्यात आला.

कसा आहे हा रोबो -
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ, चिंचोळय़ा गल्ल्या, बेसमेंटची आग अशा ठिकाणी फायर रोबो थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. या रोबोची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. प्रत्येक रोबोचे वजन सुमारे 400 ते 500 किलो आहे. रोबोतील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्ट दाखवेल. उष्ण तापमानात रोबो स्वत:चे संरक्षण करेल. रोबो बॅटरीवर चालणार असून पाण्याचे पाईप ओढणे, आग विझवणे असे अडथळे दूर करेल. सध्या ईस्त्रायल, चीन, अमेरिका असे रोबो तयार करते. विमान बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. 700 अंश सेल्सिअसच्या तापमानातही हा ‘जवान’ काम करू शकणार आहे.

फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा रोबो 55 मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो. 300 मीटरपर्यंत त्याचे रिमोटद्वारे नियंत्रण करणे शक्य आहे. यामध्ये कॅमेरा बसविण्यात आला असल्याने घटनास्थळाचाही अंदाज घेता येणार आहे. अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. हा रोबो यशस्वी ठरला तर आणखी दोन आणखी रोबो आणण्याची तयारी अग्निशमन दलाने केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details